प्रतिनिधी/कोल्हापूर
स्वच्छतेसंदर्भात कोल्हापुरातील नागरिक दक्ष झाले आहेत. आता प्लॅस्टिक मुक्तांसाठी शहरवाशियांनी सज्ज व्हावे, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. त्यांना जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने जनस्वास्थ पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये पुरस्कार वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक सुरेश शिपुरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून युरालॉजिस्ट डॉ. विश्वनाथ मगदूम होते.
आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले की, पर्यावरण आणि स्वच्छतेकडे युवकांनी लक्ष देण्याची गरज आहे. स्वच्छतेची सुरवात स्वतः पासून करा. काही दिवसांपूर्वी शहरातील ओढे नाले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सर्वच घटकातील लोकांनी सहभाग घेतला. 1 एप्रिल पर्यंत शहर प्लॅस्टिक मुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच 1 एप्रिल ते 1 मे या काळात पंचगंगा नदीला जोडणारे सर्व नाले साफ करण्यात येणार असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले.
जनस्वास्थ्य अभियान अंतर्गत जिल्हय़ातील आदर्श शाळा, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या वतीने पुरस्कार देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात पथनाटय़ाने झाली. वि. स खांडेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी शून्य कचरा या विषयावर पथ नाटय़ सादर केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक दीपक देवालापुरकर यांनी केले. याप्रसंगी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, किरण लोहार, सुरेश संकपाळ, डॉ. इकबाल शेख, बृहस्पती शिंदे, आर. वाय पाटील यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.