पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व देशांना आवाहन
प्रतिनिधी/ पणजी
आयुर्वेदाला वैश्विक दर्जा मिळवून देण्यासाठी जगभरातील देशांनी योगदान देऊन भारताला सहकार्य करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पणजीत आयोजित 9व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि आयुष राज्यमंत्री महेंद्रभाई मुंजपारा, आदी मान्यवर त्यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना पंतप्रधानांनी, जगातील 30 हून अधिक देशांनी आयुर्वेदाला पारंपरिक औषध पद्धती म्हणून स्वीकारल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आयुर्वेदाची ओळख आणखी व्यापक करण्यासाठी अधिक जोमाने कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
एक काळ असा होता जेव्हा योग तुच्छ मानला जात होता. तोच योग आज संपूर्ण मानवजातीसाठी आशा आणि अपेक्षांचा स्रोत बनला आहे. त्याचबरोबर आरोग्य आणि निरोगीपणाचा महोत्सव म्हणून जगभरातून ’आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
आयुर्वेद ही एक जीवन पद्धती देखील आहे. ज्याप्रकारे यंत्र किंवा संगणक यांनी कार्यपद्धती ठरलेली असते त्याचप्रकारे आपले शरीर आणि मन यांचीही कार्यपद्धती असली पाहिजे. दोन्ही सुदृढ आणि एकमेकांशी सुसंगत असायला हवे असे आयुर्वेद आपल्याला शिकवते. ‘योग्य झोप’ हा आज वैद्यकीय शास्त्रासाठी चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. आयुर्वेद क्षेत्रात सर्वांसाठी संधी आहेत. 8 वर्षांपूर्वी केवळ 20 हजार कोटी रुपयांचा असलेला आयुष उद्योग आज सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
प्रगत विज्ञान केवळ ’पुरावा’ हे प्रमाण मानत असल्यामुळे आजपर्यंत आयुर्वेदाचे निष्कर्ष आणि परिणाम आपल्या बाजूने असतानाही पुराव्याच्या बाबतीत आपण मागे पडत होतो. आधुनिक वैज्ञानिक मापदंडाच्या प्रत्येक दाव्याची पडताळणी करण्यासाठी आपला वैद्यकीय डेटा, संशोधन आणि जर्नल्स एकत्र आणायला हवेत. हे काम पूर्ण होईल तेव्हा आयुर्वेदाला जागतिक सहमती आणि सहज स्वीकृती मिळेल असे मोदी यांनी पुढे म्हणाले.
पारंपरिक औषधांच्या क्षेत्राचा विस्तार
पारंपरिक औषधांचे क्षेत्र सातत्याने विस्तारत आहे आणि आपल्याला त्याच्या प्रत्येक शक्मयतेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल. याचाच परिणाम म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेने जामनगरमध्ये पारंपरिक औषधांसाठीचे पहिले आणि एकमेव जागतिक केंद्र स्थापन केले. त्याचबरोबर केंद्र सरकारने स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना केल्यामुळे आयुर्वेदाबद्दल उत्सुकता, उत्साह आणि विश्वास वाढला, असे मोदी यांनी नमूद केले. अशावेळी खास करून गोव्यासारख्या राज्यानेही आयुर्वेद आणि योग यातील संधींचा पर्यटनदृष्टय़ा वापर करून घ्यावा. त्या दिशेने धारगळ येथील आयुर्वेद इस्पितळ एक महत्त्वाची सुरुवात ठरू शकते, असे पंतप्रधान म्हणाले.
आयुर्वेदाचे महत्व जगाला ज्ञात ः सोनोवाल
आयुषमंत्री सोनोवाल यांनी आपल्या भाषणातून जगभरातील देशांना आता आयुर्वेदाचे महत्व कळून चुकले असून भारतामुळेच आयुर्वेदाचे हे सामर्थ्य जगाला समजले असल्याचे सांगितले. धारगळ येथे स्थापन करण्यात आलेले इस्पितळ म्हणजे आयुर्वेद परंपरा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा सुमेळ साधणारी संस्था असेल, असेही ते म्हणाले.
स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करणार ः मुख्यमंत्री
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बोलताना गोवा आणि आयुर्वेदासाठी आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे गौरवोद्गार काढले. गेल्या 70 वर्षात जे झाले नाही ते मोदी यांनी केवळ 8 वर्षात करून दाखवले. त्याचबरोबर आयुर्वेदाच्या पारंपरिक चिकित्सेला जागतिक महत्व प्राप्त करून दिले, असेही ते म्हणाले. आता गोव्यासाठीही स्वतंत्र आयुष मंत्रालय स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.
रविवारी दुपारी पणजीत दाखल झाल्यानंतर मोदी यांनी सर्वप्रथम कांपाल येथे जागतिक आयुष परिषदेच्या आरोग्य प्रदर्शनास भेट दिली. त्यानंतर सभेस संबोधित केले. त्यावेळी त्यांच्याहस्ते धारगळ येथे बांधण्यात आलेले आयुष रुग्णालय, दिल्लीत बांधण्यात आलेले ऑल इंडिया होमिओपॅथी इन्स्टिटय़ूट आणि गाझियाबाद येथे बांधण्यात आलेले ऑल इंडिया युनानी इन्स्टिटय़ूट, या संस्थांचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कळ दाबून लोकार्पण केले. विज्ञान भारती संस्थेचे अध्यक्ष शेखरसिंग मांडे यांनी स्वागत केले.