निराधार वृध्दांनी दिला एकमेकांना आधार, आस्था बेघर केंद्रात अनोखा विवाह सोहळा
मानसिंगराव कुमठेकर/मिरज
आस्था बेघर केंद्रात मंगळवारी आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. केंद्रातील आश्रित शालिनी आणि कवठेएकंद येथील दादासाहेब साळुंखे यांचा शुभमंगल सोहळा होता. 66 वर्षांच्या शालन यांनी 79 वर्षाच्या दादासाहेब यांचा हात धरुन संसाराची गाठ नव्याने मारली होती. आयुष्याच्या संध्याकाळी या निराधार दाम्पत्याचे रेशीमबंध जुळले होते. या अनोख्या विवाह सोहळ्याला आयुक्तांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत सांगली येथे आस्था बेघर केंद्रात सुरू आहे. यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या निराधार पुरूष आणि महिला आश्रित आहेत. त्यांची देखभाल, जेवणखाण हे आस्था केंद्रामार्फत केले जाते. महापालिका आणि सामाजिक संघटना यासाठी मदत करतात. यापैकी कुणी मुला-बाळांनी नाकारल्याने इथे आलेले असतात. तर कुणी कुटुंबात आधार देणारे कोणी नसल्याने येथे आश्रय घेतलेले असतात. गेल्या काही वर्षात आस्था केंद्राने अशा आश्रितांना आधार देण्याचे त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम मायेने केले आहे.
याच आश्रमात गेल्या काही दिवसांपासून राहणाऱया शालिनी यांची कहाणी मात्र वेगळी आहे. त्या मुळच्या पुणे येथील पाषाण भागात राहणाऱया आहेत. पती आणि मुलाचे निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी दूर सारल्यामुळे त्यांनी या आस्था केंद्रात आसरा घेतला. वयाच्या 66 व्या वर्षी त्या आस्था केंद्रात दाखल झाल्या. मात्र, येथे त्यांना एकटेपण जाणवत होते. याचवेळी कवठेएकंद येथील 79 वर्षाचे निवृत्त शिक्षक दादासाहेब साळुंखे हेही पत्नीच्या निधनानंतर एकाकी झाले होते. त्यांच्या मुला-बाळांची लग्ने होऊन ते अन्यत्र राहण्यास आहेत.
आश्रमवासीय शालिनी आणि दादासाहेब यांच्या जीवनात आयुष्याच्या संध्याकाळी एकाकीपण आले होते. त्यांनी हे एकाकीपण घालविण्यासाठी एकमेकांना आधार देण्याचा निश्चय केला. आश्रमाच्या संचालकांसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला. संचालकांनी त्यास मान्यता दिली. आणि मंगळवारी या वृद्ध दांपत्यांचा अनोखा विवाहसोहळा आश्रमाच्या प्रांगणात पार पडला. उर्वरित आयुष्य एकमेकांच्या आधाराने जगण्याची शपथ घेत कोणताही बडेजाव न करता हे शुभंगल पार पडले. पारंपारिक विधींना फाटा देत, सत्यशोधक पद्धतीने हा विवाह करण्यात आला.
या आगळÎावेगळÎा सोहळÎाला उपस्थिती दर्शवत महापालिका आयुक्त नितीत कापडणीस, उपायुक्त चंद्रकांत आडके यांनी दांपत्याला भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. या विवाहसोहळÎाचे संयोजन आश्रमाच्या व्यवस्थापक ज्योती सरवदे, सुरेखा शेख, वंदना सवाखंडे, अश्विनी नागरगोजे, प्रतिभा भंडारे, स्वप्नील शेडगे, सुरेश बनसोडे, सविता काळे, पूजा मोहिते, रूपाली काळे यांनी केले. या अनोख्या सोहळÎासाठी विविध सामाजिक संघटनांनी नवदांपत्याला संसारोपयोगी साहित्याची मदत केली. आयुष्याची संध्याकाळ सुखकर व्हावी, म्हणून या निराधार व्यक्तिंनी घेतलेला विवाहाचा निर्णय सर्वत्र चर्चेचा ठरला.