जागेच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही -आरोग्य सचिवांच्या
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ातील पहिले आयुष हॉस्पीटल रत्नागिरी तालुक्यात होणार असल्याची घोषणा कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात झाली होती. मात्र 4 महिने उलटून गेले तरी हा प्रस्ताव शासन दरबारीच पडून आहे. या हॉस्पीटलसाठीच्या जागेचा प्रस्ताव आरोग्य सचिवांकडे पाठवण्यात आला आहे, मात्र त्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने आयुष हॉस्पिटलचे घोडे अडल्याचे समजते.
कोरोनाच्या रूग्णांवर आयुष उपचार पद्धतीही वरदान ठरत आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर जिल्हय़ात स्वतंत्र आयुष रूग्णालय उभारण्याचा निर्णय जिल्हा रूग्णालयाकडून घेण्यात आला. या निर्णयाला जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनीही मंजुरी दिली आहे. नव्या आयुष रूग्णालयासाठी जिल्हा प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या मागील 3 एकर जागा निवडण्यात आली. याचा प्रस्ताव राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आला. मात्र 4 महिने उलटत आले तरीही आरोग्य सचिवांकडून त्याला मान्यता मिळालेली नसल्याने रूग्णालयाचे काम अडकले आहे.
सध्या जिल्हा रूग्णालयातच डॉ. काझी यांच्या नेतृत्वाखाली आयुष विभाग कार्यरत आहे. या विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कोरोना विभागात काम करत आहेत. हे उपचार कोरोना रूग्णांना फायदेशीर ठरत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना स्वतंत्र आयुष रूग्णालय झाल्यास त्याचा जिल्हावासीयांना मोठा फायदा मिळू शकतो.
‘आयुष’मार्फत ‘अर्सेनिक’ लाखो गोळय़ांचे वाटप
जिल्हय़ात आयुष विभागामार्फत होमिओपॅथिक अर्सेनिक अल्बम-30 च्या लाखो गोळय़ांचे वाटप करण्यात आले. रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या गोळय़ा प्रभावी ठरत आहेत. स्वतंत्र हॉस्पीटल झाले. आयुष विभागातील अनेक औषधांचा कोरोना रूग्णांसाठी प्रभावी वापर करणे शक्य आहे. त्यामुळे कोरोना रूग्णांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास आयुष विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी ‘तरूण भारत’शी बोलताना व्यक्त केला.