मुंबई \ ऑनलाईन टीम
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेनाच जिंकणार असल्याचा दावा केला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर कोल्हापुरी शैलीत जोरदार टीका केली. यावर पाटील म्हणाले की, आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बोल रे!
दिल्लीहून मुंबईत परताना चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनाच जिंकणार असल्याच्या दाव्याविषयी विचारण्यात आले. यावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बोल रे,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला.
दिल्लीत चार दिवस तळ ठोकून पण अमित शहांची भेट नाही झाली यावर चंद्रकांत पाटील म्हणाले …
हा रूटीन दौरा होता. आम्ही वारंवार दिल्लीत जाण्याचे कारण म्हणजे नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे. या हेतूने आमचे काम चालते. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटणे आणि खाते समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही. या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. मनसे-भाजप युतीची या भेटीत चर्चा होणार होती ती झाली नाही. त्याबाबत विचारले असता आमची युतीसाठी भेट नव्हतीच. एकमेकांना समजून घेणे, मनसेची परप्रांतीयांबाबतची भूमिका समजून घेण्यासाठी ही भेट होती. युतीबाबत केंद्रीय नेतृत्वाने रेड अलर्ट दिला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .