नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. यांनी अधिकाऱयांना धारेवर धरताच आली जाग
प्रतिनिधी/ बेळगाव
घरोघरी जाऊन कचरा उचल करण्यावर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आरएफआयडी बसविण्यात आले आहेत. मात्र, सदर योजना मार्गी लागली नसल्याने नगरविकास मंत्री बसवराज बी. ए. यांनी अधिकाऱयांना धारेवर धरले. त्यामुळे ही योजना कार्यान्वित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, मनपाला देण्यात आलेले खराब आरएफआयडी टॅग सोमवारी कंत्राटदाराला परत देण्यात आले.
शहरातील विविध घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत 47 कोटींचा निधी खर्चून कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन कचरा उचल करणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी आरएफआयडी यंत्रे बसविण्यात आली आहेत. पण अद्याप कार्यान्वित करण्यात आली नाहीत. त्यामुळे महापालिका आढावा माहिती देताना हा मुद्दा उपस्थित झाला. सदर योजनेकरिता निधी खर्च करण्यात आला असून अद्याप अंमलबजावणी का केली नाही, असा मुद्दा उपस्थित केला. कंट्रोल ऍण्ड कमांड सेंटरसाठी 47 कोटांचा निधी खर्चूनही वापर होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. सदर योजनेची अंमलबजावणी तातडीने करण्याचा आदेश बजावला आहे. त्यामुळे नगरविकास मंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी जागे झाले आहेत. आरएफआयडी कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून, स्मार्ट सिटी कंपनीच्या कंत्राटदाराने दिलेले आरएफआयडी टॅग खराब निघाले आहेत. सदर टॅग बदलून देण्याची सूचना कंत्राटदाराला मनपाने केली आहे. टॅग ठेवण्यासाठी कर्मचाऱयाकडे कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. कचरा घेताना आरएफआयडी रीडिंग करावे लागते. त्यावेळी स्वच्छता कामगाराचे हात अस्वच्छ असल्यास त्याच हाताने आरएफआयडी यंत्रणेवर टॅगने रीडिंग घ्यावे लागते. त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱयांना ही यंत्रणा हाताळणे अडचणीचे ठरत आहे. आरएफआयडी टॅग ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱयांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे.