72 पैकी 60 स्कॅनर मशीन नादुरुस्त : क्रमांक स्कॅन करीत नसल्याची तक्रार
प्रतिनिधी /बेळगाव
स्वच्छता मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. यावर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आरएफआयडी उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. मात्र आरएफआयडी स्कॅनिंगसाठी देण्यात आलेली यंत्रे कूचकामी ठरली असून महापालिकेने सदर यंत्रे स्मार्ट सिटी कंपनीला परत केली आहेत. त्यामुळे या योजनेंतर्गत खर्ची घालण्यात आलेला निधी वाया गेला असल्याचे निदर्शनास आले आहे.
स्मार्ट सिटी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्वच्छ शहर आणि सुंदर शहर बनविण्याकरिता स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध योजना राबविल्या आहेत. याअंतर्गत शहरातील विविध चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सध्या घरोघरी जाऊन कचऱयाची उचल केली जाते. पण कचरा घेण्यासाठी स्वच्छता कामगार नियमितपणे येत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत असतात. त्यामुळे या कामकाजावर नजर ठेवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आरएफआयडी उपकरणांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक घराच्या प्रवेशद्वारावर आरएफआयडी क्रमांक व यंत्रणा बसविली होती. स्वच्छता कामगार कचरा घेण्यासाठी आल्यानंतर त्याठिकाणी स्कॅनिंग मशीनद्वारे स्कॅनिंग केले जाते. त्यामुळे किती घरातून कचऱयाची उचल केली व कोणत्या घरातील कचरा घेतला नाही, याची माहिती उपलब्ध होते.
तांत्रिक अडचणी जैसे थे
ही यंत्रणा कार्यान्वित करून वर्ष होत आले. पण यातील तांत्रिक अडचणी जैसे थे आहेत. स्मार्ट सिटी कंपनीने स्कॅनिंगकरिता महापालिकेला स्कॅनिंग यंत्रे दिली होती. पण सदर आरएफआयडी स्कॅनर मशीन सातत्याने नादुरुस्त होत आहे. स्मार्ट सिटी कंपनीने महापालिकेला 72 स्कॅनर मशीन दिल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत 60 मशीन परत केल्या आहेत. सदर मशीन आरएफआयडी क्रमांक स्कॅन करीत नसल्याची तक्रार होत आहे.
अत्याधुनिक सुविधेसाठी खर्च केलेला निधी पाण्यात
या स्कॅनर मशीन घेऊन स्वच्छता कामगारांना घरोघरी फिरावे लागते. तसेच आरएफआयडी क्रमांक स्कॅन करून घरातील कचरा घ्यावा लागतो. यावेळी ओला आणि सुका अशा दोन्ही प्रकारचा कचरा जमा करून घ्यावा लागत असल्याने दोन डबे आणि स्कॅनिंग मशीनचा भार कर्मचाऱयांच्या हातावर असतो. पण काहीवेळा या स्कॅनर मशीन स्कॅन करीत नसल्याने स्वच्छता कामगारांची डोकेदुखी वाढली आहे. स्मार्ट सिटी कंपनीने दिलेल्या सर्व स्कॅनर मशीन नादुरुस्त झाल्या असून केवळ 12 मशीन कार्यरत आहेत. त्यामुळे सदर आरएफआयडी यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून अत्याधुनिक सुविधेसाठी खर्ची घालण्यात आलेला निधी पाण्यात गेला आहे.