प्रतिनिधी/ चिकोडी
आरएसएस म्हणजे संस्कार व संस्कृतीचे प्रतीक असून मातृभूमीची रक्षा व देश प्रेम वाढवण्याचे काम करीत आहे. आरएसएस हे कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नाही, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते भारतीय बौध्दिक सेवा प्रमुख परागजी अभ्यंकर ग्वाल्हेर यांनी केले.
ते शहरातील आरडी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित आरएसएस पथसंचलन व समावेश कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी राणी चन्नमा विद्यापीठाचे प्रा. हर्षकुमार कांबळे होते. यावेळी व्यासपीठावर अरविंद देशपांडे, मुरसिद्धाप्पा हारुगिरी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना परागजी अभ्यंकर म्हणाले, सध्या देशात संघामार्फत 1,35,000 सेवा केंद्रे चालू असून हेगडेवर यांनी लावलेल्या आरएसएसच्या लहानशा रोपटय़ाचा आज वटवृक्ष निर्माण झाला आहे. यावेळी हर्षकुमार कांबळे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. स्वागत आरडी नसलापूरे यांनी केले. तर आभार विजय भावे यांनी मानले.
तत्पूर्वी शहरातील प्रमुख मार्ग महावीर चौक ते के .सी. रोड, नगरपालिका, जुने कोर्ट, दत्त देवस्थान गल्ली, जैन पेठ, डंबळ कुट, रविवार पेठ, सोमवार पेठ, चन्नम्मा चौकामार्गे आरडी मैदानात सांगता झाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा महिला व नागरिकांनी स्वयंसेवकावर मोठय़ा प्रमाणात पुष्पवृष्टी केली. तसेच रस्त्यावर भव्य प्रमाणात रांगोळी काढण्यात आली होती. पथसंचलनामध्ये प्रामुख्याने विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, खासदार आण्णासाहेब जोल्ले, महेश भाते, संजय अडके, जगदीश कवटगीमठ, धन्यकुमार गुंडे, बसवप्रसाद जोल्ले यांच्यासह हजारो संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. तर सार्वजनिक कार्यक्रमात प्रामुख्याने महिला व बालविकास मंत्री शशिकला जोल्ले, राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, आमदार दुर्योधन ऐहोळे, भाजप चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजेश नेर्ली यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.