प्रतिनिधी/ संकेश्वर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव राजशेखर उर्फ रवी हिरेमठ (वय 54) यांचे शनिवारी सकाळी ह़ृदयविकाराचे निधन झाले. त्यांच्यावर कुरणी येथील त्यांच्या शेतमळय़ातच अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगी व 4 वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.
राजशेखर यांना कोरोनाची बाधा झाली होती. 15 दिवसापूर्वीच ते बाधामुक्त झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे कुरणी गावासह आरएसएस व भाजप समूह शोकाकुल झाला आहे.
राजशेखर हे वयाच्या 16 व्या वर्षी संघाचे सदस्य बनले होते. तेंव्हापासून आजतागायत संघाचे निष्ठावंत शिलेदार म्हणून काम पहात होते. त्यांचा प्रामाणिकपणा व संघटनात्मक चिकाटी पाहून वरिष्ठांनी त्यांच्याकडे बेळगाव, बागलकोट, विजापूर व धारवाड जिल्हय़ाचे सचिवपद सुपूर्द केले होते. त्यांना दोन महिन्यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यावर केएलई इस्पितळात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
शनिवारी त्यांचे पार्थिव मुळगावी कुरणी येथे आणण्यात आले. येथे आरएसएस कार्यकर्ते, भाजपचे प्रमुख नेते व ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आला. याप्रसंगी खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार अनिल बेनके, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक, माजी मंत्री शशिकांत नाईक, ऍड. रामचंद्र जोशी, ऍड. प्रकाश मुतालिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी शोकसभा घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली.