पंचमसाली समुदायाला आरक्षण : आमदार यत्नाळ आक्रमक : गृहमंत्र्यांच्या उत्तरानंतर विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत लांबणीवर
प्रतिनिधी / बेंगळूर
लिंगायत पंचमसाली समुदायाचा समावेश प्रवर्ग 2 मध्ये समाविष्ट करण्याची मागणी करून सत्ताधारी भाजपचे आमदार बसवनगौडा पाटील यत्नाळ यांनी आक्रमक भूमिका घेतली. आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहे. मात्र, सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. आरक्षण देणार की नाही याविषयी सरकारने सभागृहात स्पष्टपणे सांगावे. अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यत्नाळ यांनी दिला. आरक्षणासंबंधी गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी उत्तर दिल्यानंतर सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले.
बुधवारी विधानसभेत पंचमसाली समुदायाला आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, चर्चेसाठी ते उपलब्ध नाहीत. त्यामुळे आमदार यत्नाळ यांनी, मुख्यमंत्री बेपत्ता झाले आहेत. आणखी एकीकडे मंत्रीही उपलब्ध नाहीत. आपल्याला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मागील निवडणुकीत आपल्या समुदायाने तुमच्यासाठी मोठे योगदान दिले आहे. म्हणूनच येडियुराप्पा यांना मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले आहेत. ही बाब त्यांनी विसरु नये, असा टोला लगावला.
आमदार यत्नाळ यांच्या विधानांमुळे संतप्त झालेले मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव आमदार एम. पी. रेणुकाचार्य म्हणाले, तुम्ही अशा पद्धतीने बोलणे योग्य नाही. तुमच्या आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहे. मात्र, मुख्यमंत्री बेपत्ता झाल्याचे विधान करणे तुम्हाला शोभत नाही. लिंगायत, वक्कलिग, कुरुब यासह सर्व समुदायांबद्दल मुख्यमंत्र्यांना आदर आहे. त्यांच्याविषयी खालच्या पातळीवर बोलू नका, असे परखड बोल सुनावले. त्यामुळे रेणुकाचार्य आणि बसवनगौडा यत्नाळ यांच्यामध्ये शाब्दिक जुंपली.
दरम्यान, यत्नाळ यांनी आपल्या समुदायातील अनेक स्वामीजींनी 700 कि. मी. पदयात्रा काढली आहे. बेंगळूरमध्ये 10 लाखहून अधिक जणांचा मेळावाही घेतला आहे. तरी सुद्धा आपल्या समुदायाला न्याय मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. त्यानंतर बसवराज बोम्माई यांनी, कायद्यात तरतुदी असल्याप्रमाणे पंचमसाली समुदायाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर सभाध्यक्षांनी कामकाज सोमवारपर्यंत लांबणीवर टाकले.
सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे
पंचमसाली समुदायाला आरक्षण देण्याबाबत बुधवारी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले होते. मात्र, मुख्यमंत्री चर्चेसाठी उपस्थित न राहिल्याने भाजप आमदार बसवगौडा पाटील यत्नाळ यांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे आंदोलन सुरू केले. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी अर्थसंकल्पावर चर्चा सुरू करावी. चर्चेनंतर बोलण्यास वेळ देण्यात येईल, असे सांगितले. मात्र, यत्नाळ यांनी आरक्षणाविषयी आताच चर्चा झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली. त्यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आधी यत्नाळ यांना बोलू द्या. आपण नंतर बोलू असे सांगून यत्नाळ यांना पाठिंबा दर्शविला.
विधानपरिषदेत कोरमचा अभाव
सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रतोद, मंत्री आमदारांच्या अनुपस्थितीमुळे बुधवारी विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी संतप्त झाले. त्यामुळे अर्थसंकल्पावर चर्चा करणे शक्य झाले नाही. परिणामी सभापतींनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत लांबणीवर टाकले. गुरुवारी महाशिवरात्री असल्याने अनेक आमदार गावी गेले. शुक्रवारीही ते हजर राहणे शक्य नसल्याने कामकाज सोमवारपर्यंत ढकलण्यात आले. बुधवारी भोजन विरामानंतर दुपारी विधानपरिषदेच्या कामकाजाला पुन्हा प्रारंभ झाला. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांची उपस्थिती अत्यंत कमी होती. मंत्रीही अनुपस्थित असल्याने अर्थसंकल्पावर चर्चा करण्यास कोरमचा अभाव निर्माण झाला. त्यामुळे काही सदस्यांनी कामकाज सोमवारपर्यंत लांबणीवर टाकण्याची मागणी केली. त्यावेळी सभापती होरट्टी यांनी सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी पुढे ढकलता येईल, किंवा सोमवारपर्यंत लांबणीवर टाकता येईल. यापैकी एक पर्याय स्वीकारण्याचा सल्ला दिला. त्यानंतर विरोधी पक्षनेते एस. आर. पाटील यांनी अनेक मंत्री, आमदार महाशिवरात्रीनिमित्त गावी गेले आहेत. त्यामुळे ते कामकाजाला हजर राहणार नाहीत, असे कारण सांगितले. त्यानंतर सभापतींनी कामकाज सोमवारपर्यंत पुढे ढकलले.