प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभाव सांगितला आहे. सगळ्यांना त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. त्याच धर्तीवर मराठा आरक्षणाची मागणी केलेली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर, अशा शब्दात खासदार उदयनराजे यांनी विविध वाहिन्यांवर शुक्रवारी दिलेल्या मुलाखतीत रोखठोक भूमिका मांडली. दरम्यान, त्यांनी गल्लीत लक्ष नाही तर मुंबई, दिल्लीत काय घालणार अशी टिप्पणीही नाव न घेता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर केली.
काही प्रसिद्धी माध्यमांनी मराठा आरक्षणावरून नेतृत्व कोण करणार, उदयनराजे की संभाजीराजे असा सवाल खडा करून वातावरण ढवळून काढले आहे. त्याच अनुषंगाने विविध वाहिन्यांवर उदयनराजे यांच्या आज सुरू असलेल्या मुलाखतींनी अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. उदयनराजे म्हणाले, माझी बांधिलकी लोकांशी, कोणत्या पक्षाशी नाही. पक्ष जरी कोणताही जरी असला तरी त्या लोकांच्या जीवावर असतो. त्या लोकांचा आदर केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते की सर्वधर्म समभाव. सगळ्यांना त्यांचे राईट मिळाले पाहिजेत. त्याच धर्तीवर ह्या लोकांनी मागणी केली. मला एक कळत नाही. जे माझ्या बुद्धीला पटत नाही ते मी सहन करत नाही कोणीपण असू, धनगर समाज असू दे, मुस्लिम समाज असू, माळी समाज असू दे, ह्या जाती कोणी निर्माण केल्या पहिल्या होत्या का?, कामाच्यामुळे जाती तयार झाल्या आहेत. आता मला सांगा संपूर्ण मराठा समाजाची आरक्षणाची मागणी आहे. मी कोर्टाचा अवमान करत नाही, पण कोर्ट म्हणजे काय माणसंच असतात ना. तुमच्या आमच्यासारखी माणसं. त्यांना कळायला पाहिजे. त्यांनी बाय हार्ट विचार करायला हवा होता. त्या समाजातील, ह्या समाजातील प्रत्येकाला न्याय दिला पाहिजे, एवढीच प्रामाणिक अपेक्षा माझी, अजून काय? तसेच न्याय देता येत नसेल तर लोकशाही काय कामाची त्यापेक्षा राजेशाही असती तर जनतेला न्याय मिळाला असता असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.
मराठा समाजात उद्रेक वाढत असून समाजातील मागण्या लोकप्रतिनधींनी जाणून घेणे गरजेचे आहे. नाहीतर अशाने उद्रेक वाढून लोक तुडवतील’’ अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पोराबाळांना काय तोंड देणार? आरक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच छत्रपती घराण्यात जन्मल्याने स्वाभिमान असून भाग्य देखील आहे. वेळ आल्यास मराठा समाजाचे नेतृत्वदेखील करू. तसेच कोणत्याही समाजावर अन्याय झाल्यास आपण खंबीर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.’’ असे देखील उदयनराजेंनी यावेळी सांगितले.
आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर उदयनराजेंनी एका फेसबुक पोस्टद्वारे संताप व्यक्त केला होता.’’ जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या सवलती तसेच नोकरभरतीतले आरक्षण कायम ठेवावे यासाठी सरकारने तातडीने अध्यादेश काढावा. अन्यथा होणाऱया परिणामाला सामोरे जावे. मराठा समाजाच्या प्रत्येक लढय़ात मी त्यांच्यासोबत आहे. समाजाच्या उन्नतीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. या लढय़ात मराठा समाजासोबत मी आहे हे सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला आहे.