कोरेगाव / वार्ताहर :
बहुजनांना पहिले आरक्षण देणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे दिनाचे औचित्य साधून उद्या (दि.26) मराठा, धनगर आणि मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी सातारा ते राजभवन, मुंबई येथे 340 कि.मी पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे शिवसेना क्षत्रिय प्रमुख अमोल आवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाठार स्टेशन ता. कोरेगाव येथे आशीर्वाद मंगल कार्यलयात मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षण मागणीसाठी झालेल्या पत्रकार परिषदेत अमोल आवळे बोलत होते. राष्ट्रीय समाज पक्ष्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाऊसाहेब वाघ, भीमाशंकर अहिरेकर, शैलेंद्र भोईटे उपस्थित होते.
आवळे म्हणाले, शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून, पदयात्रेच्या माध्यमातून या मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा होणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी पायी प्रवास व निवेदनाद्वारे प्रयत्न करीत आहोत. तसेच ओबीसीचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून थांबवण्यात आले. यामध्ये केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाला प्रायोगिक जनगणनाची माहिती देणे आवश्यक होते, त्या आधारावर, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणे गरजेचे आहे. तसेच 2017 पासून ओबीसी, एससी आणि इतर समाजाच्या नोकरीमधील पदोन्नती थांबवण्यात आली आहे. ती बढती मिळावी, अशा मागण्यासाठी सातारा येथून दि. 26 रोजी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करुन या पदयात्रेला प्रारंभ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व म्हणून कार्यरत असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.