प्रतिनिधी / मुंबई
मराठा क्रांती मोर्चा तर्फे आज मुंबईत 20 ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आले. जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. राज्यातील मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यात पोलीस भरती होत असल्याने मराठा समाजावर अन्याय होईल यातून मराठा समाजात नाराजी पसरली असल्याने आज शांततेत आंदोलन करण्यात आली.
लालबाग, परळ, दादर, पवई आय.आय.टी मेन गेट, विक्रोळी कन्नमवार नगर, भांडुप, घाटकोपर, पंतनगर, मुलुंड, चेंबूर सारखी उपनगरातील रस्ते आणि चौक या ठिकाणी मराठा बांधवांनी हे आंदोलन केले. आजच्या नियोजित आंदोलनासाठी काल (शनिवारी) विविध ठिकाणी बैठक झाल्या. यावेळी रविवारच्या आंदोलनाची दिशा ठरली. देण्यात येणाया घोषणा, कोरोना काळातील नियमाचे पालन आणि शांततेचे संदेश देत आंदोलन करण्याचे ठरले. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजात संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी कोरोनाचे नियम पालन करत तोंडाला मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझरचा आंदोलनकर्त्यांनी वापर केला.|
या वेळी पवई सकल मराठा समाज चे प्रवक्ते पंकज लाड यांनी सांगितले की, दोन वर्षाने पुन्हा एकदा मराठा समाजाला रस्त्यावर उतरावे लागले आहे. मराठा आरक्षणावर आणलेली स्थागिती असे पर्यंत शासनाने कोणतीही भरती करू नये. केंद्र आणि राज्य सरकारने आदेश पारित करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे असे समाजाचे म्हणणं असल्याचे लाड म्हणाले. तर जे आरक्षण लागू केले आहे ते आहे तसेच चालू ठेवावे अन्यथा उठणाया उद्रेकाची जबाबदारी राज्य सरकारची राहील असे राहुल कदम यांनी सांगितले. या वेळी भगव्या सह टाळ आणि झाँज वाजवून घोषणा देत शांततेत आंदोलन झाले असल्याचे विजय कानस्कर यांनी सांगितले. मराठा समाजाने पूर्वीच्या आंदोलनातुन ताकद दाखवून दिली आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या स्थगितीला विरोध दर्शवत राज्यात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी सरकारला दिला. दरम्यान आंदोलनात अनुचीत प्रकार घडू नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.