प्रतिनिधी / गुहागर
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रकल्पामध्ये दाभोल पॉवर कंपनीचे कायमस्वरूपी कामगार आणि आरजीपीपीएल प्रशासन यांच्यामध्ये बायोमेट्रिक थम्सवरून वाद सुरू आहे. हा वाद सोमवारपासून सुरू आहे.
या वादामुळे १४३ कामगार कंपनीच्या गेट बाहेर उभे आहेत. पूर्वीच्या दाभोळ वीज प्रकल्पातील कायमस्वरूपी असलेल्या दोनशे कामगारांनी आपणाला आरजीपीपीएल कंपनीमध्ये कायमस्वरूपी सामावून घ्यावे, असा दावा केला आहे. दाभोळ वीज प्रकल्पातील या कामगारांच्या बाजूने लेबर कमिशनर कोल्हापूर यांनी निर्णय दिल्याने, याविरोधात आरजीपीपीएल प्रशासन मुंबई हाय कोर्टामध्ये गेले आहे. यामुळे त्याचा निकाल निकाल लागेपर्यंत कंपनी आणि कामगारांमध्ये कोणताही समझोता नको अशा प्रकारचे निर्बंध लागले आहेत. परंतु मार्च महिन्यामध्ये आरजीपीपीएल प्रशासनाने कामावर येण्याअगोदर बायोमेट्रिक थम्स प्रत्येक कामगाराने द्यावे, अशा प्रकारचा नियम लावला आहे.
बायोमेट्रिक हे यूपीएल कंपनीचे आहे. त्यामुळे आम्ही आरजीपीपीएलचे कर्मचारी असल्याने बायोमेट्रिक थम्स देणार नसल्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. परिणामी सोमवारपासून बायोमेट्रिक थम्स न केल्याने कंपनीत प्रवेश नसल्याने, सर्व कामगार कंपनीच्या गेट बाहेर उभे आहेत. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत कंपनी प्रशासनासोबत बैठका पार पडली. मात्र यावर कोणताच निर्णय अद्याप झालेला नाही.