प्रतिनिधी/ वास्को
सांकवाळचे ग्रामस्थ आणि आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे नारायण दत्ता नाईक यांच्यावर सांकवाळ पंचायत इमारतीसमोर शनिवारी दुपारी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात नारायण नाईक गंभीर जखमी झालेले असून त्यांना गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या डोक्यावर व पायावर वार झालेले आहेत. मात्र, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणातील हल्लेखोर अज्ञात आहेत. जखमी नारायण नाईक हे सांकवाळचे पंच व भाजपाचे दक्षिण गोवा अध्यक्ष तुळशिदास नाईक यांचे ज्येष्ठ बंधू आहेत.
ही घटना शनिवारी दुपारी 12.15 वा.च्या सुमारास सांकवाळ पंचायत इमारतीसमोरच घडली. दोघा अज्ञात बुरखाधारीनी नारायण नाईक यांच्यावर लोखंडी सळई व पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचे डोके फुटले तसेच पायाची हाडे मोडली. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांनी तातडीने गोमेकॉमध्ये दाखल केले. नाईक यांच्यावर झालेला हल्ला काहींनी पाहिला. मात्र, विशाल नाईक हा युवक वगळता इतरांना हल्लेखोरांना रोखण्याचे धैर्य झाले नाही. त्यामुळे अज्ञात हल्लेखोर घटनास्थळावरून लगेच पसार होण्यास यशस्वी ठरले. हल्लेखोराने प्रथम पंचायत कार्यालयातून कोणी बाहेर येऊ नये म्हणून या कार्यालयाची गेट बंद केली होती. वेर्णा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झालेली असून पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोधही जारी ठेवला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत अज्ञात हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागले नव्हते.
असा झाला प्राणघातक हल्ला
नारायण नाईक दुपारी 12 वा.च्या सुमारास सांकवाळच्या पंचायत कार्यालयात काही दस्तऐवज मिळवण्यासाठी आले होते. सांकवाळ पंचायतीच्या सचिवांशी त्यांनी काही वेळ चर्चा केली. त्यानंतर दस्तऐवज घेऊन ते पंचायत कार्यालयातून खाली उतरले. यावेळी भेटलेल्या एका मित्रासोबत बोलत असतानाच पाठीमागून आलेल्या अज्ञाताने सळईने डोक्यावर हल्ला केला. त्यामुळे ते खाली कोसळले. त्याच वेळी प्रगटलेल्या दुसऱया हल्लेखोराने त्याच्या पायावर लोखंडी पाईपने वार केला व त्याना मारण्यासाठी पिस्तुल रोखले. त्यांच्याबरोबर असलेल्या युवकाने हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर काही अंतर पायी चालत जाऊन दोघेही दुचाकीवरून पसार झाले. ही घटना घडली त्यावेळी सरपंच रमाकांत बोरकर आपल्या घरी होते. त्यांना या घटनेची माहिती मिळताच ते त्वरित घटनास्थळी दाखल झाले व त्यांनीच नारायण नाईक यांना स्वतः कार चालवत बांबोळीतील गोमेकॉमध्ये आणले. गोमेकॉमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
हल्ल्याचा प्रत्यक्ष साक्षीदार विशालने दाखवले धैर्य
नारायण नाईक यांचा एक जवळचा मित्र, विशाल नाईक आपल्या कामानिमित्त तिथे स्वस्त धान्य दुकानावर आला होता. नारायण नाईकची कार पाहून तो कार्यालयात गेला. चर्चा करीतच ते दोघे खाली उतरले. त्यांच्यासमोरूनच गेलेल्या एका व्यक्तीने नारायण नाईकवर प्रथम हल्ला केला. त्यानंतर दुसऱयाने हल्ला केला. भांभावलेल्या विशाल याने हा हल्ला रोखण्यासाठी जवळच त्याच्या हाताला लागलेला दंडुका घेऊन हल्लेखोरावर वार केला असता हल्लेखोरांनी त्याच्यावर वार करून त्याला बाजूला केले. मात्र, तरीही पळून जाणाऱया हल्लेखोरांमागे तो धावला. शेवटी पाठलाग टाळण्यासाठी हल्लेखोरांपैकी एकाने पिस्तूलाचा धाक दाखवल्याने त्याला थांबावे लागले अशी माहिती विशाल नाईक यानेच प्रसिद्धी माध्यमांना दिली. त्याच्या म्हणण्यानुसार ज्या पद्धतीने हल्लेखोरांनी नारायण नाईक यांच्यावर हल्ला केला ते पाहता ते हल्लेखोर नाईक यांना जीवे मारण्यासाठीच आले होते. घटनेच्या वेळी पाऊस नव्हता व पावसाची चिन्हे नव्हती. परंतु हल्लेखोरांनी रेनकोट परीधान केला होता. चेहरा मास्क व इतर कपडय़ांनी गुंडाळलेला होता. पसार होण्यासाठी त्या अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीचा वापर केल्याचे विशाल नाईक यांनी म्हटले आहे.
बेकायदा व्यवहार चहाटय़ावर आणण्याचा पंधरा वर्षांपासून सपाटा
सांकवाळचे ग्रामस्थ असलेले नारायण नाईक हे मागच्या साधारण पंधरा वर्षांपासून बेकायदा प्रकारांविरुद्ध आवाज उठवीत असतात. अनेक भ्रष्ट प्रकरणांचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न ते करीत आलेले आहेत. कोमुनिदाद व इतर जमीन घोटाळय़ावरही ते तुटून पडायचे. काही बांधकाम व्यावसायिक तसेच जमिनींचा व्यवहार करणाऱयाविरुद्ध ते उघडपणे कार्यरत होते. अनेकांचा भांडाफोड करण्यासाठी ते माहिती हक्काचा पुरेपूर उपयोग करायचे. अशा कार्यातच ते अधिक व्यस्त असायचे. त्यामुळे त्यांना आरटीआय कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे. समाज माध्यमांतूनही ते अनेकांची बेकायदा प्रकरणे चहाटय़ावर आणायचे. त्यांनी हाती घेललेल्या काही संशयास्पद प्रकरणासंबंधीचे विवाद न्यायालयातही निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. नारायण नाईक हे सांकवाळ कोमुनिदादचे काही काळ अध्यक्ष होते.
धोक्यामुळे नारायण नाईक यांना करावा लागला होता हवेत गोळीबार
साधारण दहा वर्षांपूर्वी त्यांनी सांकवाळ कोमुनिदादच्या जमिनीवरील अतिक्रमणासंबंधी आवाज उठवला होता. सांकवाळच्या मेटास्ट्रीप कंपनीजवळ कारवाई चालू असताना त्यांच्याविरुद्ध रोष व्यक्त होऊ लागला. त्यामुळे धोका वाटू लागल्याने नारायण नाईक यांना हवेत गोळीबार करावा लागला होता. हे प्रकरण त्यावेळी बरेच गाजले होते. अनेकांच्या गैरप्रकारांविरुद्ध सतत आवाज उठवण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांनी अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. शनिवारी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य कारण हेच असण्याची दाट शक्यता आहे.
बंधू तुळशिदास नाईक यांचा पंचायत मंडळावर संशय
दरम्यान, नारायण नाईक हे सांकवाळचे पंच व भाजपाचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष तुळशिदास नाईक यांचे ज्येष्ठ बंधू असून या घटनेचा निषेध करताना सहकारी विशाल नाईक याने धैर्य दाखवले नसते तर नारायण नाईक यांची हत्या झाली असती. हल्लेखोर त्याच निश्चयाने आले होते असे म्हटले आहे. बेकायदा प्रकरणांविरुद्ध आवाज उठवणे, अनेकांची कुलंगडी बाहेर काढणे याचाच परिणाम म्हणून हा हल्ला झालेला असून या कृत्यामागे कोण आहेत, याचा उलगडा लवकरच होईल असे स्पष्ट करून त्यांनी सांकवाळ पंचायत मंडळावर संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोर हिंदीत बोलत होते असेही तुळशिदास नाईक यांनी म्हटले आहे.
हल्लेखोरांचा शोध लावणे आवश्यक ः रमाकांत बोरकर
दरम्यान, सांकवाळचे सरपंच रमाकांत नाईक यांनी नारायण नाईक बेकायदा प्रकारांबाबत आवाज उठवायचे. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांचा रोष असण्याची शक्यता मान्य करून अशा रोषातूनच हा हल्ला घडला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, सांकवाळ पंचायतीकडे त्याचे चांगले संबंध होते. शनिवारी सकाळी आपल्याकडे ते काही वेळ बोलले होते. त्यानंतर आपण पंचायतीच्या कामासाठी बाहेर गेलो. तेथून घरी गेलो. घटनेची माहिती मिळताच आपण त्वरित पुन्हा दाखल झालो. पंचायत कार्यालयाबाहेर अशा घटना घडणे धोकादायक असून अशा प्रकारचे हल्ले आपल्यावर तसेच इतर पंच सदस्यांवर होऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात गुंतलेल्या हल्लेखोरांचा शोध लावणे आवश्यक आहे, असे सरपंच बोरकर यांनी म्हटले आहे.