नोंदणीसाठी एजंटांवर राहावे लागते विसंबून
प्रतिनिधी/ बेळगाव
तंत्रज्ञानाच्या वापरामुळे माणसांचा ससेमीरा कमी झाला आहे. त्यामुळेच राज्य वाहतूक विभागाने वाहन परवाना तसेच नव्या वाहनाच्या नोंदणीची प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात सुरू केल्या आहेत. जेंव्हा हा आदेश जारी करण्यात आला तेंव्हा नागरिकांतून याचे स्वागत करण्यात आले. मात्र आरटीओ कार्यालयातील गोंधळ आणि सर्व्हर डाऊनचे कारण अनेकांना डोकेदुखीचे ठरु लागले आहे. ऑनलाईन नोंदणीसाठीही एजंटांवर विसंबून रहावे लागते. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागत आहे. दरम्यान एजंट आणि आरटीओ कार्यालयातील काही अधिकाऱयांच्या मिलीभगतमुळेच सर्व्हर डाऊन होत आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी नागरिकांना आवश्यक अर्ज घर बसल्या भरून या सेवांचा लाभ घेता येणार होता. तर काहींनी आरटीओ कार्यालयात जाऊन अर्ज केले असते तरी चालले असते. मात्र अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया आरटीओ कार्यालयात नसल्याचेच उघडकीस आले आहे. त्यामुळे नागरिकांना एजंटांवर विसंबून रहावे लागत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. वारंवार याबाबतच्या तक्रारी करण्यात आल्या. मात्र आरटीओंनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक विभागाने सर्व आरटीओ कार्यालयांचा कारभार संगणकी कृत करण्यावर भर दिला आहे. या अन्वये सर्व आरटीओ कार्यालये एकमेकांशी जोडली गेली आहेत. यामुळे या पुढे ऑनलाईन स्वरुपात शिकावू व पक्का वाहन परवाना तसेच नूतन वाहनांची नोंदणी करुन घेतली जाणार, असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्याक्षत हे चित्र काही वेगळेच आहे. जोपर्यंत एजंट नोंद करुन देत नाहीत तोवर पुढील प्रक्रिया रखडलेलीच असते. त्यामुळे नागरिकांतून सतांप व्यक्त करण्यात येत आहे.
खात्याच्या वेबसाईटवर जाऊन संबंधित कामासाठीचा अर्ज नागरिकांनी भरण्याचे आवाहन केले असले तरी वाहन आणि सारथी या ऍपवर नोंदणी करण्याची तसदी आरटीओ विभाग घेत नाही. याबाबत अधिकाऱयांना अर्ज भरण्याचे सांगितल्यास सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून त्यांना एजंटांकडे पाठविण्यात येते. त्यामुळे आरटीओ कार्यालयातील अधिकारी व एजंट यांची मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान आरटीओ परिसरात संपूर्णतः एजंट राज्यच सुरु आहे. त्यामुळे येथील दुकाने हटवून आरटीओ कार्यालयाचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिक कार्यालयात कामासाठी गेल्यावर त्याचे होणार नाही, असे सांगून पाठविले जाते. त्यामुळे तो व्यक्ती एजंटांकरवी गेला तरच ते काम पूर्णत्वाकडे जाते. त्यामुळे अधिकाऱयांची किटकीट नको म्हणून अनेक जण एजंटांवरच विसंबून असतात. याला अधिकारीही तितकेच कारणीभूत ठरतात. त्यामुळे यापुढे तरी आरटीओ कार्यालयाचा कारभार सुधारावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
प्रक्रिया ऑनलाईन आणि एजंट जुनेच
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने आरटीओ विभागात पादर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु केली आहे. ही प्रक्रिया सुरु झाली असली तरी एजंट जुनेच आहेत. त्यामुळे आता आरटीओंनी स्वतः याकडे गांभीर्याने लक्ष देवून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. अधिकाऱयांची तातडीने बैठक घेवून एजंटांना थारा देवू नये, अशा सूचना त्यांनी करण्याची गरज आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.