वार्ताहर/ राजापूर
रत्नागिरी प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयाचा कारभार तेथील अधिकारी, कर्मचारी चालवतात की एजंट, असा सवाल उपस्थित केला जात आहे. एजंटमार्फत गेल्यावर आरटीओ कार्यालयातील कामे होतात, अन्यथा ताटकळत बसावे लागते, असा अनुभव अनेकांना येत आहे. शासनाकडून एजंटगिरी बंद असल्याचा दावा केला जात असताना अधिकारी, कर्मचाऱयांनी मात्र सर्व कार्यालयत एजंट्सच्या हवाली केल्याचे चित्र असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.
रत्नागिरी आरटीओ कार्यालयाने स्वतःला एजंटांच्या हवाली केल्याने जिल्हय़ातील ग्रामीण भागातून येणाऱया सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. आरटीओ कार्यालयात केवळ एजंटांचेच नाणे चालते. जर एखादी व्यक्ती एजंटमार्फत न जाता स्वतःहून कामासाठी गेला तर त्याला ताटकळत ठेवले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. आरटीओ कार्यालयात सर्वात आधी कोणत्या एजंटकडून आला आहात, अशी विचारणा होते. एजंटच नाव सांगितल्यावर कागद पटापट पुढे सरकतात आणि कामही लवकर होते. अन्यथा ‘जरा थांबा’ असे सांगून ताटकळत ठेवले जाते, अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. आरटीओ कार्यालयातील एजंटगिरी बंद करण्यासाठी ऑनलाईन पध्दतीचा अवलंब केला जात आहे. मात्र पुढील कार्यवाहीसाठी कार्यालयात एजंटचा ‘आधार’ अनिवार्य असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. यामुळे शासकीय शुल्काच्या काही पट रकमेचा भुर्दंड नागरिकांना पडत आहे. यामुळे एजंट आणि आरटीओ कार्यालय यांचे आर्थिक हितसंबंध तर जोडलेले नाहीत ना, असा सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे.
यापुढे अशा तक्रारी येणार नसल्याची दक्षता घेणार या बाबत आपण जातीने लक्ष घालून कर्मचाऱयांना योग्य त्या सूचना देईन. यापुढे अशा तक्रारी येणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी विवेक भंडारे यांनी ‘तरुण भारत’ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.