व्यापाऱयांना होणार लाभ : निधी हस्तांतरण होणार सुलभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
डिजिटल देवाणघेवाण करणाऱया बँक खातेधारकांसाठी विशेषकरून व्यावसायिकांसाठी अत्यंत चांगले वृत्त आहे. रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीमची (आरटीजीएस) सुविधा आता 24 तास उपलब्ध झाली आहे. ही सुविधा रात्री 12.30 वाजल्यापासून पूर्णवेळ सुरू झाली आहे. एनईएफटीची सुविधा पूर्वीपासूनच पूर्णवेळ उपलब्ध आहे. नव्या सुविधेचा सर्वाधिक लाभ व्यापारी आणि उद्योजकांना होणार आहे. निधी हस्तांतरणासाठी आता त्यांच्यावर वेळेची मर्यादा नसणार आहे.
आरटीजीएसची सुविधा दिवसभर म्हणजेच पूर्णवेळ उपलब्ध होणार आहे, हा निर्णय अंमलात आणण्यासाठी आरबीआय, आयएफटीएएस आणि सेवा भागीदारांचे अभिनंदन, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ट्विट करत म्हटले आहे. याचबरोबर आरटीजीएस सुविधा पूर्णवेळ उपलब्ध असलेल्या देशांच्या यादीत भारत सामील झाला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत या बदलांची घोषणा केली होती. नव्या निर्णयामुळे आरटीजीएसद्वारे बँकखातेधारकांना कधीच पैसे हस्तांतरित करता येणार आहेत.
कोरोना काळात ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण प्रचंड वाढल्यानंतर आरबीआयने आरटीजीएसची सुविधा पूर्णवेळ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने देशांतर्गत वित्तीय बाजारपेठेच्या ग्लोबल इंटीग्रेशनच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी आरटीजीएसचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला होता.
आरटीजीएस
आरटीजीएस ही डिजिटल स्वरुपात निधी हस्तांतरणाची एक पद्धत आहे. याच्या मदतीने प्रत्यक्षवेळेत रक्कम हस्तांतरित होते. आरटीजीएसचा वापर मुख्यत्वे मोठी रक्कम हस्तांतरित करण्यासाठी केला जातो. यांतर्गत किमान 2 लाख रुपये तर कमाल 10 लाख रुपयांची रक्कम हस्तांतरित करता येते. आरटीजीएसद्वारे 2 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या निधी हस्तांतरणासाठी कमाल शुल्क 24.5 रुपये आहे. तर 5 लाखांहून अधिक रकमेच्या हस्तांतरणासाठी बँक 49.5 रुपयांपर्यंतचे शुल्क आकारू शकते. यावर जीएसटीही भरावा लागतो. देशातील सर्वात मोठी बँक असलेली एसबीआय आरटीजीएसवर कुठलेच शुल्क आकारत नाही.
2004 साली प्रारंभ
आरटीजीएस सुविधेचा प्रारंभ 26 मार्च 2004 रोजी झाला होता. त्या काळात केवळ 4 बँका या सेवेशी जोडल्या गेल्या होत्या. परंतु आता देशाच्या 237 बँका या व्यवस्थेद्वारे 4.17 लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण प्रतिदिन पूर्ण करतात. नोव्हेंबर महिन्यात आरटीजीएसद्वारे सरासरी 57.96 लाख रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. तर यापूर्वी दुसरा आणि चौथा शनिवार वगळता महिन्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आरटीजीएसच्या मदतीने निधी हस्तांतरित करता येत होता.