मालवण एसटी प्रशासनाच्या कारभाराकडे कोण लक्ष देणार?
अहवाल न येताच पाठविले लांब पल्ल्याच्या डय़ुटीवर
एसटी कर्मचाऱयांचा जीव धोक्यात
प्रतिनिधी / मालवण:
आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या कर्मचाऱयांना तात्काळ डय़ुटीवर जाण्याचे फर्मान काढल्याने मालवण एसटी आगाराच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्तीने घरात राहून आराम करणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांकडून सांगण्यात येते. तरीही मालवण एसटी आगाराच्या अखत्यारित असलेल्या कर्मचाऱयांची आरटीपीसीआर टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट येण्यापूर्वीच तात्काळ डय़ुटी लावली गेल्याचे समोर आले आहे. यात काही चालक व वाहकांना लांब पल्ल्याच्या गाडय़ांवर पाठविण्यात आल्याने त्यांच्या कुटुंबियांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मालवण एसटी आगारातील अनेक चालक व वाहक गेले वर्षभर मुंबईत कार्यरत होते. मुंबईहून आल्यानंतर त्यांची आरोग्य तापसणी केली जात नव्हती. त्यामुळे अनेकदा कर्मचारी आणि प्रशासन यांच्यात वाद होत होता. आता एसटी प्रशासनाने पुन्हा मुंबईच्या डय़ुटीवर जाणाऱया कर्मचाऱयांना आरटीपीसीआर टेस्ट अनिर्वाय केल्याने कर्मचारी एकच दिवस तपासणीसाठी गेले होते. या सर्व कर्मचाऱयांचे रिपोर्ट मंगळवारी येण्याची शक्यता आहे. असे असताना त्यांना सोमवारी डय़ुटी लावण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चार दिवस विश्रांती आवश्यक
आरटीपीसीआर तपासणी केल्यानंतर संबंधित व्यक्तीने चार दिवस घरीच थांबण्याच्या सूचना तपासणी कक्षाकडून देण्यात येतात. हा रिपोर्ट जिल्हा रुग्णालयातून तीन ते चार दिवसांनी येतो. रिपोर्ट आल्यानंतर व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली, तर तिच्याशी तात्काळ संपर्क साधण्यात येतो. तरीही मालवण एसटी प्रशासनाने आरटीपीसीआर केलेल्या कर्मचाऱयांना लांब पल्ल्याच्या डय़ुटीवर पाठविल्याने त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल केला जात आहे. एसटी प्रशासनाने अशाप्रकारे कर्मचाऱयांच्या जीविताशी खेळण्यापेक्षा आरटीपीसीआर रिपोर्ट केलेल्या कर्मचाऱयांचे रिपोर्ट आल्यानंतरच त्यांना डय़ुटीवर पाठविणे आवश्यक आहे. या कारभारामुळे मालवणातील कर्मचाऱयांमध्ये प्रचंड असंतोष आहे.