गोव्यात उमेदवार उभे करणार नाही : सकारात्मक विकासासाठी देशात, राज्यात भाजप हवे
प्रतिनिधी /पणजी
रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात एकाही मतदारसंघात आपला उमेदवार ठेवणार नाही, त्या ऐवजी चाळीसही मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला समर्थन देऊन गोव्यात भाजपला सत्तेवर आणणार, असे आरपीआय नेता तथा केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवल यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
गोव्यात मागास जातीची लोक संख्या फार कमी आहे. गोव्यात आपल्या पक्षाचे तेवढे कार्य रुजलेले नाही. भारतीय जनता पक्षाला आपल्या पक्षाचे समर्थन असल्याने 2022 मधील निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेण्याऐवजी सर्व मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना निवडून आणणे सोयीस्कर ठरेल, असे ते म्हणाले.
डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारने गोव्यात उत्कृष्ट काम केलेच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विकास झपाटय़ाने केला आहे. अशा सकारात्मक विकासासाठी केंद्रातच नव्हे तर प्रत्येक राज्यात भाजपचे सरकार हवे, असे ते म्हणाले.
गोव्यात आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी आपले बस्तान मांडत आहेत. रिपब्लीकन मात्र मागे आहे यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, लोकशाहीत कुठलाही पक्ष कुठल्याही राज्यात निवडणूक लढवू शकतो. त्याला कोणी अडवू शकत नाही. निवडणुकीत प्रत्येकाने आपले नशीब आजमावून पहावे. शेवटी मतदार राजाच श्रेष्ठ आहे. त्याला काय हवे तेच होणार असल्याचे ते म्हणाले. गोव्यात भाजप सत्तेत आहे व आपला पक्ष सत्ताधारी पक्षासोबत आहे. त्यामुळे आपल्या मतदारांवर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत नाही. त्यांची कामे होतात त्यामुळे रिपब्लीकन पक्षाने आपली ताकद दाखविण्याची आवश्यकता भासत नाही, असे ते म्हणाले.