बेळगाव :स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. पण शहरवासीयांसाठी आवश्यक असलेल्या नागरी सुविधा उपलब्ध करण्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. परिणामी आरपीडी कॉर्नर परिसरात सांडपाण्याचे तळे साचत असून वाहनधारकांना व स्थानिक व्यावसायिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गटारींचे बांधकाम आणि रस्त्यांचा विकास करण्यासाठी कोटय़वधी निधी खर्च करण्यात येत आहेत. आरपीडी कॉर्नर परिसरातील डेनेज समस्येचे निवारण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. आरपीडी रोडचे काँक्रिटीकरण करून दुतर्फा गटारीसाठी पाईप घालण्यात आल्या. पण सांडपाण्याचा निचरा होण्याच्यादृष्टीने कोणतीच सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे आरपीडी कॉर्नरच्या शेजारी असलेल्या चेंबरमधून सांडपाणी ओव्हरफ्लो होत आहे. या कॉर्नरशेजारी खड्डय़ामध्ये सांडपाणी साचून राहत आहे. याचा व्यावसायिक व वाहनधारकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. काहीवेळा वाहनांच्या वर्दळीमुळे सांडपाणी पादचारी आणि दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर उडते. परिसरात शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ नेहमीच असते. विद्यार्थ्यांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. येथील सांडपाण्याची समस्या निकालात काढावी अशी मागणी सातत्याने करण्यात आली. पण मनपाने कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे मनपाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत असून, सांडपाण्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.