प्रतिनिधी /बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) मध्ये घेतले जाणारे निर्णय हे विद्यार्थी विरोधी असतात. या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना बसत असून हा भोंगळ कारभार बंद करावा, या मागणीसाठी अभाविपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. बुधवारी बेळगाव दौऱयावर असलेले उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांना अभाविपने निवेदन देऊन कारभार सुधारण्याची मागणी केली आहे. आरसीयूमध्ये विनादंड प्रवेशासाठी कमी कालावधी व दंडरहित प्रवेशासाठी अधिक कालावधी घेतला जात आहे.
विद्यार्थ्यांकडून केवळ फी जमा करणे असा उद्देश यामागे असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याचबरोबर रोज एक नवीन परिपत्रक काढून याद्वारे नवीन माहिती दिली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असून शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे विद्यापीठातील अधिकाऱयांना योग्य समज द्यावी, अशी मागणी अभाविपने केली आहे.