प्रतिनिधी /बेळगाव
डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस केलेल्या विद्यार्थ्यांना बी. कॉम, द्वितीय वर्षाला प्रवेश देण्यासाठी राणी चन्नम्मा विद्यापीठ (आरसीयू) च्या कुलगुरुंनी आडकाठी घातली आहे. यामुळे 120 विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात सापडले असून, त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत उच्च शिक्षणमंत्री अश्वथनारायण यांच्याकडे तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये 120 विद्यार्थी डिप्लोमा इन कमर्शियल प्रॅक्टिस या अभ्यासक्रमाला होते. यावषी कोरोनामुळे डिप्लोमा टेक्निकल एज्युकेशन (डीटीई) ने निकाल देण्यास दोन महिने विलंब केला. 7 डिसेंबर रोजी या विद्यार्थ्यांचा निकाल देण्यात आला. परंतु बी. कॉम. च्या विद्यार्थ्यांचे वर्ष सुरू होऊन बरेच महिने उलटले असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
राज्यातील इतर विद्यापीठांनी डीटीईच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना बी. कॉमच्या द्वितीय वर्षास प्रवेश दिला आहे. परंतु राणी चन्नम्मा विद्यापीठाने मात्र प्रवेश देण्यास विरोध केला आहे. आरसीयूचे कुलगुरु रामचंद्रगौडा यांना डीटीई तसेच बेळगाव सरकारी डिप्लोमा कॉलेजच्या प्राचार्यांनी पत्र लिहूनही त्यांनी आपली आडकाठी भूमिका सुरूच ठेवली आहे. इतर विद्यापीठांनी परवानगी दिली, मग आरसीयूलाच का अडचण येते असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहेत. गुरुवारी रात्री या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणमंत्री अश्वथनारायण यांची भेट घेऊन त्यांना या झालेल्या गेंधळाची माहिती दिली.
शुक्रवारी विद्यार्थ्यांचे आंदोलन
शुक्रवारी पॉलिटेक्निक कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. आमच्या शैक्षणिक नुकसानाला आरसीयू जबाबदार असून, प्रवेश न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा ईशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांनी निवेदनाची एक प्रत डीटीई तसेच आरसीयूला पाठविली आहे.