प्रतिनिधी/ रत्नागिरी/
‘निसर्ग’ चक्री वादळामुळे छप्पर उडून गेले. शिल्लक असलेल्या मातीच्या भिंती पावसाने भिजून गेल्या. आता त्या नव्याने उभारल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. परंतु प्रशासन म्हणत आहे अंशतः नुकसान. दुसऱया बाजूला मंडणगड तालुक्यातील शिगवण नावाच्या गावात चक्क आरसीसी घरांच्यावर शोभेच्या टाईल्स उडून गेल्या म्हणून घर पूर्णपणे कोसळल्याची मदत खात्यात जमा झाली आहे. विशिष्ट कंपूवर खूप मोठी मेहरबानी करायचे प्रशासनाने ठरवलेच आहे. परंतु ती मेहरबानी छप्पर उडून गेलेल्या आणि भिंती दुबळ्या बनलेल्या गरीब नागरिकावर का केली जात नाही असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीचे सहकार्यवाह सचिन शेठ यांनी केला आहे.
सचिन शेठ हे मंडणगडचे रहिवासी असून वादळग्रस्तांना मदतीचे काम ते संघ स्वयंसेवकांसोबत झोकून देऊन करत आहेत. जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांसमवेत अनेक गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन वस्तुस्थितीची पाहणी करत आहेत. अनेक कुटुंबे आर्थिक दुर्बल असून मिळणारी शासकीय मदत त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी पुरणारी नाही. अशा लोकांना जनकल्याण समिती व अन्य सामाजिक संस्थांकडून छपराचे पत्रे व अन्य मदत मिळवून देण्याचे काम ते करत आहेत. आजवर मंडणगड तालुक्यातील अनेक गावांना त्यांनी भेटी दिल्या.
ते म्हणाले, मंडणगड तालुक्यातील शिगवण या गावीच नव्हे तर गुडेघर, चाकवली, बोरखत, किल्लावाडी अशी एक ना अनेक कितीतरी नुकसानग्रस्त गावे आहेत. यातील अनेक घरांवरची छपरे उडून गेली. मातीच्या भिंतीवर सलग दोन-तीन दिवस पाऊस पडला. अनेक वर्षे जुन्या असलेल्या भिंती पावसामुळे दुबळ्या बनल्या. भिंती तशाच ठेवून छपराची उभारणी करणे शक्य नाही. हे कोणी अभियंताच नव्हे तर सामान्य गावकरी देखील सांगतात.
ते पुढे म्हणाले, या परिस्थितीत प्रशासन मात्र अंशतः नुकसानीचा पंचनामा करत आहे. घर मालकांना केवळ 5000 रुपये मिळतात. या लोकांचे दुःख मोठे आहे. पुन्हा उभे राहण्यासाठी अंशतः नुकसानग्रस्त म्हणून मिळणारी मदत पुरणारी नाही.
त्यांनी आणखी सांगितले, मंडणगड तालुक्यातील शिगवण गावात खरे तर संपूर्ण उद्ध्वस्त घरे केवळ 5 एवढी झाली आहेत. सरकारी पंचनाम्यामध्ये ती 50-60 पर्यंत दाखवली गेली आहेत. विशिष्ट कंपुमध्ये समाविष्ट असलेल्या घरांना खास नजरेतून पाहण्याचे प्रशासनाने ठरवले आहे. आरसीसी असलेल्या घरांना पूर्ण नुकसानग्रस्त म्हणून पंचनामे झाले आहेत. काही आरसीसी घरांच्या वर तिरक्या स्लॅबला शोभेच्या टाईल्स चिकटवलेल्या असतात. अशा टाईल्स वादळात उडून गेल्या म्हणून ते घर पूर्णतः नुकसानग्रस्त असे दाखवण्यात आले. त्याला दीड लाखांची मदत लागू झाली.
सचिन शेठ यांनी पुढे सांगितले की, आरसीसी बांधकामे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली म्हणून दाखवणाऱया प्रशासनाने छपरे उडून गेलेल्या व अशक्त भिंतींच्या घरांना पूर्ण नुकसानग्रस्त म्हणून धरले नाही. प्रशासनाने अशक्त भिंतींच्या घरांना पूर्ण नुकसानग्रस्त म्हणून मदत द्यावी एवढीच आपली मागणी आहे. आरसीसीला पूर्ण नुकसानग्रस्त म्हणून मदत वाटप होत असेल तर खरोखरी नुकसानीच्या घराला ती मिळावी एवढीच आमची आग्रही मागणी आहे.