चिपळूण-वालोपेतील घटना, बदली चालकाकडून गाडी मुंबईत
चिपळूण
मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणारी सिंधुदुर्ग येथील कालभैरव ही खासगी बस शनिवारी रात्री 1 च्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथे आल्यानंतर गाडीचा चालक अचानक गायब झाला. हा चालक नेमका कुठे गेला याचा पत्ताच नसल्याने प्रवाशांत गोंधळ उडाला. अखेर बदली चालक आणून पहाटे 4.30 च्या सुमारास ही बस मुंबईच्या दिशेने शनिवारी रवाना झाली.
सिंधुदुर्ग जिह्यातील कालभैरव बस 40हून अधिक चाकरमान्यांना घेऊन शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास बांद्याहून निघाली. ही गाडी शनिवारी रात्री 1 च्या सुमारास वालोपे येथे आली. यावेळी गाडीचा चालक प्रवाशांना कोणतीच कल्पना न देता गायब झाला. बराच वेळ गाडी तशीचा उभी होती. एका प्रवाशाला रात्री 2.30 वाजण्याच्या गाडीत चालक नसल्याचे लक्षात आले. यानंतर सर्व प्रवासी जागे झाले आणि एकच गोंधळ उडाला.
या चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याला यश आले नाही. अखेर याची माहिती चिपळूण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येत ट्रव्हल्स मालकाशी संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यांनी नवा चालक उपलब्ध करून दिल्यानंतर पहाटे 4.30 च्या सुमारास बस पुढे रवाना झाली. वाशी येथे डिझेलअभावी पुन्हा ही बस बंद पडली. बस मालकाने डिझेलची उपलब्धता केल्यानंतर तब्बल 24 तास उशिराने ही गाडी मुंबईत पोहचल्याची माहिती प्रवासी सुवर्णा शेलार यांनी ‘तरुण भारत’ ला दिली.