ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यांनी आरेतील जंगल व कारशेड संदर्भात मोठी घोषणा केली. आरेतील मेट्रो कारशेड आता कांजूरमार्गमध्ये होणार आहे तसेच आरे जंगलांची व्याप्ती वाढवून ती 800 एकर करण्यात आली आहे, अशी घोषणा ठाकरे यांनी केली.
ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, आरेतील कारशेड आता कांजूरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कांजूरमार्ग येथील जमीन सरकारची आहे. त्यामुळे जमिनीसाठी एकही पैसा द्यावा लागणार नाही. कारशेडसाठी जनतेचा पैसा वापरण्यात येणार नाही.
आरे जंगलात जवळपास 100 कोटींचा खर्च करून एक बिल्डींग उभारली आहे. ते पैसे वाया जाणार नाहीत. बिल्डींग अन्य कारणासाठी वापरण्यात येईल. जंगलात शहरे उभी राहतात. पण जगाच्या पाठीवर शहरात जंगल कुठे होत नाही. ते आपण करत आता आहोत. 800 एकरवर शहरामध्ये आपण जंगल वसवणार आहोत. जंगल टिकवताना आदिवासी आणि स्थानिकांवर कोणताही अन्याय होणार नाही, असेही ठाकरे यांनी सांगितले.