ऑनलाईन टीम / मुंबई :
मेट्रो कारशेड दुसऱया ठिकाणी हलवणं व्यवहार्य नसून आरे कॉलनीमध्येच कारशेडचं काम सुरु ठेवलं जावं अशी शिफारस करण्यात आली आहे. मेट्रो कारशेड समितीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही शिफारस करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनीच ही समिती गठीत केली होती. समितीला कारशेडसाठी पर्यायी जागा सापडलेली नाही. पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अहवालावर प्रतिक्रिया देताना अहवाल बंधनकारक नसल्याचं म्हटलं आहे.
मेट्रो 3 प्रकल्पाच्या 25 व्या भुयारीकरणाचा टप्पा आज वरळीत पूर्ण झाला. आदित्य ठाकरे यावेळी उपस्थित होते. आरे कारशेडच्या अहवालासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, अहवाल अजूनही पूर्ण आलेला नाही. तो बंधनकारक नाही. अहवालावर अभ्यास करुनच पुढील निर्णय घेतला जाईल.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारने तात्काळ स्थगिती उचलली पाहिजे अशी मागणी केली आहे.