ऑनलाईन टीम / जळगाव :
जळगाव जिल्ह्यात आजअखेर 102 कारोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा कोराना मृत्यूदर हा राज्यात सर्वाधिक असल्याची माहिती पुढे येताच आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी तातडीने बुधवारी जळगावकडे धाव घेतली आणि लोकप्रतिनिधी, आरोग्यसेवेतील अधिकारी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांची मॅरेथॉन बैठक घेतली. या बैठकीत समन्वय, आरोग्यसेवांचा आढावा घेत उपाययोजनांबाबत आवश्यक सूचना त्यांनी केल्या.
जळगाव जिल्ह्यात आजअखेर 821 कोरोनाबाधित रुग्णांची संख्या असून 102 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातच नव्हे, तर देशात हा मृत्यूदर सर्वाधिक 12.39 टक्के इतका आहे. सातत्याने वाढणाऱ्या यासंख्येबाबत चिंता व्यक्त होत असताना आरोग्यमंत्री टोपे बुधवारी तातडीने जळगावात दाखल झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतल्यावर टोपे यांनी कोरोना रोखण्यासाठी गरज भासल्यास मोठे ऑपरेशन करण्याची तयारी दर्शवली.
या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना टोपे म्हणाले, आपण लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या बैठकीत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. 50 टक्के रुग्ण शेवटच्या क्षणी दाखल झाले होते. त्यांना इतर आजार होते. त्यामुळे त्यांचे मृत्यू झाले असल्याचे सांगितले. आता जळगावातच टेस्टींग होत असल्यामुळे रिपोर्ट हा 24 ते 48 तासात आलाच पाहिजे. हवे तर खासगी लॅबची मदत घ्या, अशा सूचना केल्याचे त्यांनी सांगितले. जळगावचा मृत्यूदर 12 टक्केहून अधिक असल्याने जळगाव शहरातील नामांकित डॉक्टरांची टीम तयार करून त्यांचा सल्ला घ्यावा. मृत्यूदर वाढू नये म्हणून प्रयत्न करणे गरजेचे असून, यासाठी अधिक कडक नियंत्रण करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.
रिपोर्ट उशिरा आल्याने मृत्यूदर वाढला : महाजन
पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, रुग्णांचे रिपोर्ट हे दहा ते बारा दिवस येत नव्हते. त्यामुळे या रुग्णांवर उपचार होत नव्हते. रिपोर्ट उशिरा आल्यावर उपचार सुरू होत असत. यात वेळ जात असल्याने रुग्णांचा मृत्य होत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्याला राजकारण करायचे नाही, असेही त्यांनी नमूद केले.