कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन येत्या 3 मेपर्यंत वाढविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला निर्णय समयोचितच म्हणायला हवा. चीन, अमेरिका, इटली, स्पेन, फ्रान्ससारख्या देशांमध्ये हाहाकार उडवून देणाऱया कोरोनाने 200 च्या आसपास देशांना आपले उपद्रवमूल्य दाखवून दिले आहे. आजमितीला जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 लाखांवर पोहोचला असून, बळींची संख्या 1 लाख 14 हजारांवर गेली आहे. जागतिक महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱया अमेरिकेत 22 हजार नागरिकांनी प्राण गमावले असून, इतिहासात पहिल्यांदाच या देशाने 50 राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती कायदा लागू केला आहे. तर फ्रान्ससारख्या देशानेही आपल्या लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. भारताचा विचार केल्यास 21 दिवसांचा लॉकडाऊन संपुष्टात आला असला, तरी येथील कोरोनाचे दुष्टचक्र अद्याप दिसते. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 10 हजारांचा टप्पा ओलांडला असून, या विषाणूने 339 जणांचे प्राण घेतले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे अडीच हजार कोरोनाबाधित महाराष्ट्रातील असणे व त्यातही 1600 वर रुग्ण एकटय़ा मुंबईत आढळणे, हे निश्चितच चिंताजनक होय. कोरोना संसर्गाचा झपाटा बघता महाराष्ट्र वा केंद्र सरकारने लॉकडाऊन वाढविण्याचा घेतलेला निर्णय समर्थनीय ठरतो. कोरोना संसर्गानुसार ग्रीन, ऑरेंज व रेड असे झोन करण्यात आले आहेत. आता 20 एप्रिलपर्यंत प्रत्येक प्रदेशाचे मूल्यमापन होणार असून, कोरोनाचे हॉटस्पॉट न वाढल्यास संबंधित प्रदेशातील नियम शिथिल होऊ शकतात. भारतीय अर्थव्यवस्था मागच्या काही दिवसांपासून आधीच गटांगळय़ा खात आहे. नोटबंदी, जीएसटीतील गोंधळ व काही चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे ती खालावत असतानाच कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचे आजारपण अधिक लांबण्याची शक्यता आहे. कोरोनाने सर्व उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. हातावर पोट असणाऱयांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. मार्चमधील बहुतांश दिवस भरल्याने कारखान्यांतील कामगारांना एप्रिलचा पगार मिळाला खरा. पण, मेमध्ये वेतन मिळेल, याची हमी राहिलेली नाही. आयटीपासून ते ऑटोमोबाईलपर्यंत कुठलेही क्षेत्र असो. सर्वांच्या नोकऱयांवर टांगती तलवार दिसून येते. आयटी उद्योग ही सोन्याची कोंबडी मानली जाते. मागच्या काही वर्षांत वायूवेगाने या उद्योगाची भरभराट झाली. मात्र, आज अमेरिका, युरोपातही कोरोनामुळे तेथील उद्योगांना घरघर लागल्याने स्वाभाविकच त्याचा परिणाम भारतातील या उद्योगावर होणे क्रमप्राप्त ठरते. इतर क्षेत्रांवरही कमी अधिक प्रमाणात असेच परिणाम संभवतात. तसे झाल्यास येथील संपूर्ण व्यवस्थाच ढासळेल. बेरोजगारीचा विस्फोट होईल. मोदी म्हणतात, त्याप्रमाणे देश किती वर्षे मागे जाईल, हे सांगता येणार नाही. म्हणूनच कोरोनाविरूद्धची लढाई आपल्याला लवकरात लवकर जिंकावी लागेल. वास्तविक, मुंबई-पुण्यासारख्या बडय़ा शहरांना या विषाणूची झळ बसली असली, तरी अद्यापही देशातील स्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही वा कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. तो होऊ नये, याकरिता पुढचे काही दिवस आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागेल. पंतप्रधानांनी टाळय़ा, थाळय़ा वाजवायला सांगितल्या, तर लोक रस्त्यावर गर्दी करून सामूहिक थाळीवादन करतात. असे दिवे लावणे परवडणारे नाही. पोलीस, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका हे सर्व जण आपला जीव धोक्यात घालून काम करतात. त्याची बूज न राखता कुणी या ना त्या निमित्ताने गर्दी करून असहकार्याचा दृष्टीकोन बाळगत असेल, तर तो कृतघ्नपणाचा ठरतो. अशांची गय करता कामा नये. आपल्याकडील कोरोनाने बळी गेलेल्यांमधील 75 ते 80 टक्के जण हे ज्येष्ठ नागरिक वा आधीपासून अन्य विविध आजारांचे रुग्ण असल्याचे सांगितले जाते. स्वाभाविकच ज्येष्ठ तसेच किडनी, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह वा प्रतिकारशक्ती कमी असणाऱयांची अधिक काळजी वहावी लागेल. याशिवाय कोरोनाचा केवळ वृद्धांना धोका आहे, आपल्याला नाही, अशा भ्रमातही कुणी राहू नये. पुढचा टप्पा अधिक दाहकही असू शकतो, याचे भान ठेऊन सजग रहावे. पंतप्रधानांनी देशातील शास्त्रज्ञांनी कोरोनावर लस शोधण्याचा विडा उचलावा, असे आवाहन केले आहे. जगभर यावर संशोधन सुरू असून, काही देशांमध्ये यादृष्टीने प्रयत्न सुरू असलेले दिसतात. भारतीय शास्त्रज्ञांची अफाट क्षमता बघता त्यांच्याकडूनही या आघाडीवर अपेक्षा असतील. आता तरी आरोग्य हा विषय गंभीरपणे घेतला, तर येथील वैद्यकीय संशोधक आणखी मोठी मजल मारू शकतील. सरकार कोणतेही असो. अर्थसंकल्पात आरोग्यासारख्या जीवनमरणाच्या प्रश्नाची आपल्याकडे नेहमीच उपेक्षा होते. 2 मार्च 1938 मध्ये मुंबई प्रांताच्या असेंब्लीमध्ये केलेल्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अर्थसंकल्पातील सार्वजनिक आरोग्यावरील तरतूद तोकडी असल्याकडे अंगुलीनिर्देश केला होता. ‘साथीच्या आजारांनी शेकडो लोक मरण पावतात. मात्र, ग्रामीण भागात क्वचित एखादा दखाखाना दिसतो. औषध वाटप वा वैद्यकीय उपचारांसाठी कसलीही सुविधा दृष्टोत्पत्तीस येत नाही. सांडपाण्याची व्यवस्था नाही. शुद्ध पाणी, वैद्यकीय मदतीअभावी शकडो लोक मरतात,’ ही बाबासाहेबांची चिकित्सा आजही लागू पडते. इतक्या वर्षांनंतरही आपली आरोग्यव्यवस्था निरोगी नसणे, हे चिंताजनकच. तुडुंब शहरे, अतिनागरीकरण, प्रदूषण, दाटीवाटीने उभी राहिलेली घरे हे कोणत्याही विषाणूसाठी सॉफ्ट टार्गेट ठरल्यास नवल नाही. त्यामुळे शहरे किती वाढू द्यायची, आणि वाढती लोकसंख्या, याचा विचार करावा लागेल. कोरोनाचे संकट मोठेच. परंतु, बाऊ न करता त्याला सामोरे जावे. कठीण समयात साथ देणाऱया कर्मचाऱयांना कंपन्यांनी वाऱयावर सोडू नये. संकटातही संधी असू शकते. दुसऱया टप्प्य ात नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले, तर भारतासाठी तो टर्निंग पॉईंटही असेल. सिकंदराला ‘पुरू’न उरणाऱया भारतीय मनगटात ही जिद्द नक्कीच आहे. आरोग्यम् धनसंपदा, हा मंत्र जागवतच आता आपल्याला आरोग्याचे हे महायुद्ध जिंकायचे आहे.
Trending
- मुख्याध्यापक संघाचा फॉर्मुला ठरला; 23 जागांपैकी दादा लाड गटाला 12 तर बाबा पाटील गटाला 11 जागा
- हातकणंगलेतून लढण्यास चेतन नरकेंचा नकार! ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफर नाकारली; कोल्हापूरात होणार तिरंगी लढत
- ‘आम्ही टोल संपवत आहोत’: नितीन गडकरी
- स्वदेशी ‘मार्क-1ए’ विमानाकडून यशस्वी उड्डाण
- उत्तराखंडमधील नानकमत्ता साहिब गुरुद्वाराच्या डेरा प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
- केजरीवालचे गोवा ‘कनेक्शन’ उघड
- सांगोल्डाचा उपसरपंच उल्हास मोरजकर अपात्र
- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत महाराष्ट्रात ‘स्टार’ प्रचारक