वार्ताहर / कणकवली:
ओसरगाव आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत असलेले अनिल नारायण नाईक (53, रा. जानवली आदर्शनगर) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ओसरगाव येथील बालकांना लसीकरण करायचे असल्याने लस आणण्यासाठी जानवली येथून सकाळीच ते कळसुली आरोग्य केंद्र येथे गेले होते. तेथे त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
दर आठवडय़ाला एक दिवस आरोग्य केंद्र व त्या अंतर्गतचे कर्मचारी सकाळी योगा करण्यासाठी एकत्र येतात. त्याप्रमाणे शुक्रवारी सर्व कर्मचारी कळसुली आरोग्य केंद्रात एकत्र आले होते. मात्र त्यावेळी नाईक यांच्या छातीत दुखत असल्याने ते योगा न करताच लसीकरणाचे व्हॅक्सीन कॅरिअर (लसीकरणाचा बॉक्स) घेऊन ओसरगाव येथे जाण्यासाठी निघणार होते. मात्र त्यावेळी त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तेथील कर्मचाऱयांनी त्यांना कळसुली आरोग्य केंद्रातच काही वेळ विश्रांती घेण्यास सांगितले. मात्र छातीत दुखण्याचे प्रमाण वाढल्याने त्यांना तातडीने कणकवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
नाईक यांनी आरोग्य विभागात काम करताना तेथील ग्रामस्थांना रात्री- अपरात्रीही सेवा दिली. साथरोगांच्या काळात त्यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांचे सर्वांशी स्नेहाचे संबंध होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी प्रत्येक गावात आपला मित्रपरिवार निर्माण केला होता. सध्या ते कळसुली आरोग्य केंद्रांतर्गत ओसरगाव उपकेंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी नांदगाव आरोग्य केंद्र, पाच वर्षे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथे काम केले होते. मूळ वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील रहिवासी असलेले नाईक यांनी आरोग्यसेवेत रुजू झाल्यापासून 20 वर्षांतील बहुतेक काळ कणकवलीत सेवा केली. त्यांचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला होता. नाईक यांच्या निधनाचे वृत्त समजताच तालुक्यातील आरोग्य विभागासह अनेकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
नाईक यांच्यावर जानवली आदर्शनगर येथील स्मशानभूमीत शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत निखील सुदन नाईक यांनी पोलिसात खबर दिल्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.