आरोग्य समिती सभेत घेतला योजनांचा आढावा
कोल्हापूर प्रतिनिधी
ग्रामीण जनतेचे आरोग्य सदृढ ठेवाण्यासाठी आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमार्फत आरोग्य विषयक कार्यक्रमाची जनजागृती प्रभावीपणे करावी, असे आदेश जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा सीईओ संजयसिंह चव्हाण यांनी दिले.
जिल्हा परिषदेत सीईओ चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची सभा पार पडली. या बैठकीमध्ये सीईओ चव्हाण यांनी आरोग्य विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या सर्व योजनांचा आढावा घेऊन त्या पूर्ण कार्यक्षमतेने राबविण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे व सर्व कार्यक्रम अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर तालुका वैद्यकीय अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
क्षयरोग रुग्णांना दत्तक घ्या
राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम अंतर्गत निक्षयमित्र संकल्पने अंतर्गत जिल्हयातील क्षयरोग रुग्णांना प्रत्येक तालुका आरोग्य अधिकारी व प्रत्येक प्रा.आ.केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी दत्तक घेऊन त्याचे पालकत्व पूर्ण करुन घ्या. कुष्ठरोग रुग्णांचे दायित्व प्रत्येक वैद्यकिय अधिकारी लेखी आदेशाने देऊन याबाबतची त्यांच्यावर वैयक्तिक जबाबदारी निश्चित करा. कुष्ठरोगाबाबतची माहितीचा प्रसार करण्यासाठी आधुनिक प्रसार माध्यमांचा वापर करण्याच्या सूचना सीईओ चव्हाण यांनी दिल्या.
नैसर्गिक प्रसुती वाढवा, सिझेरियन कमी करा
जिल्हयातील नैसर्गिक प्रसुतीचे प्रमाण वाढवून सिझेरीयनचे प्रमाण कमी करा व शासकीय संस्थात्मक प्रसूती वाढवा असे आदेश सीईओ चव्हाण यांनी दिले. पुढील तीन महिन्यांच्या कालावधीत ‘हिट स्ट्रोक’ असल्याने लोकांनी प्रतिबंधात्मक कोणते उपाय करावे ,प्रथमोपचार कोणते केले जाणार याबाबत जनजागृती करून रुग्ण आढळल्यास त्याला तात्काळ उपचाराखाली आणा. दरमहा प्रत्येक प्रा.आ. केंद्रात किमान 10 व उपकेंद्रात 3 प्रसूती होणे अपेक्षित आहे. उपकेंद्रामध्ये जेनरीक मेडीसीन उपलब्ध करुन देण्यासाठी ज्या मेडीकलचे लायसन आहे अशांना उपकेंद्रातील एक खिडकी जेनरीक मेडीसीन विक्री करीता खुली करुन देण्याच्या सूचना सीईओ चव्हाण यांनी दिल्या.
बाह्य यंत्रणेमार्फत अ.भा.कार्डची नोंदणी नको
लोकांना आ.भा. कार्डसाठी ‘एनसीडी पोर्टल’ अंतर्गत डिजिटल ग्रामीण सेवा महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्राणा यांच्या प्रशिक्षित यंत्रणेमार्फत सर्व नोंदी पूर्ण करुन सर्व लोकांचे आ.भा. कार्ड काढा. इतर कोणत्याही बाह्य यंत्रणेमार्फत आ.भा. कार्डची नोंदणी करु नये. कोणत्याही परिस्थितीत आ.भा.कार्डधारक ‘एनसीडी पोर्टल’ला नोंद झाला पाहिजे याची नोंद घेणेत यावी. व गोल्डन कार्डसाठी लाभार्थ्यांचा कॅप घेऊन उर्वरीत लाभार्थ्याचे कार्ड अॅप्रुव्हल करुन घ्या असे आदेश सीईओ चव्हाण यांनी दिले.
कणेरी मठ परिसरात आरोग्य विषयक कार्यक्रम राबवा
‘सुमंगलम्’ कार्यक्रमानंतर कणेरी मठ तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये आरोग्यविषयक उपक्रम राबवा. पाणी शुद्धीकरणावर लक्ष द्यावे. पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी. गोवर, रुबेला लसीकरण मोहीमे अंतर्गत पूर्ण सुरक्षित बालक व पूर्ण सुरक्षित माता यांचे प्रमाण 100 टक्के पूर्ण करावे. कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करा.
30 मार्चपर्यत सर्व मुला-मुलींची आरोग्य तपासणी करा
जागरुक पालक सुदृढ बालक कार्यक्रमांतर्गत जिह्यातील सर्व मुला-मुलींची आरोग्य तपासणी 30 मार्चपर्यंत पूर्ण करायची असल्याने याबाबतचे नियोजन करावे. तसेच ज्यांचे आधारकार्ड काढून 10 वर्षे पूर्ण झाली आहेत अशांचे कार्ड अद्ययावत करण्याचे काम शासकीय शाळेत व ग्रामपंचायतीमध्ये चालू होणार आहे. तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . उत्तम मदने यांनी उपस्थितांचे आभार मानले.