प्रतिनिधी / कणकवली:
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. उपजिल्हा रुग्णालय किंवा खाजगी रुग्णालये कोविड सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत. अशात ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेण्यासाठी लोकांची रीघ पहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात कमीत कमी एक तरी भरलेला ऑक्सिजन सिलिंडर ठेवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी केली आहे.
कोरोनाकाळात ग्रामीण भागातील जनता ही केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर अवलंबून असते. सध्या गावागावात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. शहरीभागात असणारे जिल्हा रुग्णालय अथवा खाजगी रुग्णालये तसेच कोविड सेंटर हे रुग्णांनी भरलेले आहेत. अचानक ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास ग्रामीण भागातील रुग्ण दगावण्याची शक्मयता जास्त असते. यासाठी आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र व उपकेंद्र या ठिकाणी तातडीने ऑक्सिजनची व्यवस्था करावी.
काही उपकेंद्रामध्ये ऑक्सिजन सिलिंडर आहेत मात्र ते रिकामी स्थितीत आहेत. अशा सर्व ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची पाहणी करून भरलेले ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावेत. यासाठी सर्व ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी करून हे टँक उपलब्ध करून घ्यावेत, अशी मागणी कळसुली विभागातील सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी यांनी केली आहे.