राष्ट्रपती रामनाथ कोविंद – बेंगळुरात ‘राजीव गांधी’चा पदवीदान समारंभ
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनासारख्या भयंकर रोगाने सर्वांनाच धडा शिकविला आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी सार्वजनिक आरोग्य क्षेत्राला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. बेंगळुरातील राजीव गांधी विश्वविद्यालयाच्या 23 व्या वार्षिकोत्सवानिमित्त निम्हान्स येथे आयोजित विद्यार्थ्यांना सुवर्णपदक वितरण व पदवीदान समारंभात ते बोलत होते.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढे म्हणाले, आरोग्य व शिक्षण सर्वांसाठी अत्यंत आवश्यक असलेले क्षेत्र आहे. भविष्यात कोरोनासारखे संसर्गजन्य रोग आल्यास त्याला थोपवण्यासाठी आरोग्य क्षेत्र सदृढ होणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रात दररोज प्रत्येक क्षणाला नवे बदल होत असतात. कोरोना काळात आपल्या देशातील तज्ञांनी केलेले कार्य संपूर्ण मानवजातीसाठी कल्याणकारी ठरले असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे त्यांनी सांगितले.
आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत देशातील तज्ञांनी कोरोना प्रतिबंधक लस निर्माण केली आहे. यामुळे देशातील लाखो नागरिकांना लस घेणे शक्य झाले आहे. केवळ आमच्या देशात नव्हे तर जगातील विविध देशांनाही लसीचा पुरवठा केला जात आहे. हे केवळ देशातील तज्ञांमुळे शक्य झाले आहे. कोरोना काळात देश अनेक संकटांना सामोरे गेला आहे. तसेच कोरोनायोद्धय़ांनी आपले जीवन पणाला लावून काम केले आहे, असेही राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर, विश्वविद्यालयाचे उपकुलपती डॉ. सच्चिदानंद आदी उपस्थित होते.