कुडचडे काँग्रेस अध्यक्ष पुष्कल सावंत यांची टीका
प्रतिनिधी/ कुडचडे
राज्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱया मृत्युंचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर कुडचडे बाजार परिसर तसेच उर्वरित पालिका परिसरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने कुडचडेत भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंबंधी निवेदन देऊन सुद्धा कुडचडे-काकोडा नगरपालिका कोणतीच उपाययोजना करत नाही याची आपल्याला खंत वाटते, असे कुडचडे काँग्रेस गटाध्यक्ष पुष्कल सावंत यांनी कुडचडे काँग्रेस कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. सध्या कुडचडे परिसरातील कित्येक कोविड रुग्णांना बरेच त्रास सहन करावे लागत असून नुकत्याच घडलेल्या एका घटनेतून आरोग्य खाते रुग्णांची निगा घेण्यास असमर्थ असल्याचे दिसून आलेले आहे, असा दावा त्यांनी केला.
काही दिवसांअगोदर एका कुटुंबातील एका व्यक्तीला ताप येऊ लागला होता. त्या वेळेपासून सदर व्यक्ती कुडचडे आरोग्य केंद्राच्या संपर्कात होती. त्यानंतर काही दिवसांनी त्याच्या आईलाही ताप येण्यास सुरुवात झाली. आईला जास्त त्रास होऊ लागल्याने सदर व्यक्तीने कुडचडे आरोग्य केंद्राला कळविले तेव्हा मडगावच्या ईएसआय इस्पितळातीला खाटा पूर्ण भरलेल्या आहेत असे उत्तर त्यांना मिळाले. तेव्हा सदर कुटुंबातील सदस्यांनी आपल्याशी संपर्क साधला व आपण गोमेकॉतील डॉक्टरांशी संपर्क साधला. तेव्हा रुग्णाला तिथे दाखल करून घेऊ, असे उत्तर मिळाले. पण थोडय़ा वेळाने सदर व्यक्तीला ईएसआयमधून फोन आला आणि रुग्णासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, तेव्हा त्वरित घेऊन यावे असे सांगण्यात आले, अशी माहिती सावंत यांनी दिली.
त्यानंतर रात्री 10.30 च्या सुमारास कुटुंबातील सदस्यांनी तिला इस्पितळात दाखल करण्याची तयारी केली व ते रुग्णवाहिकेची वाट पाहत थांबले होते. यादरम्यान त्यांनी ईएसआयशी परत संपर्क साधला असता त्यांना लवकरच रुग्णवाहिका पोहोचणार, असे सांगण्यात आले. पण थोडय़ा वेळाने रात्री बाराच्या सुमारास ईएसआयमधून फोन कॉल आला आणि सध्या रुग्णाला ठेवण्यासाठी जागा नाही असे स्पष्ट करण्यात आले तसेच वाटेवर असलेली रुग्णवाहिका परत नेण्यात आली, असा दावा सावंत यांनी केला.
लोकांचे हाल करू नका
त्यानंतर दुसऱया दिवशी सदर कुटुंबातील सदस्यांनी राजकारण्याचा वशिला लावून ईएसआयमध्येच रुग्णाला ठेवण्याची सोय केली. असे वर्तन जर राजकारण्यांना जवळ असलेल्या लोकांशी होते, तर सर्वसामान्य लोकांचे काय, असा प्रश्न सावंत यांनी मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना केला. कारण कोरोनाचे संकट हे सर्वसामान्य नसून याबातीत सहकार्य करण्यासाठी शेजारी किंवा नातेवाईकांना सुद्धा बोलावू शकत नाही. अशा वेळेस सदर लोकांनी काय करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुडचडेतील तसेच उर्वरित राज्यातील लोकांचे हाल करू नका, असे सावंत पुढे म्हणाले. यावेळी दक्षिण गोवा जिल्हा सचिव अली शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष विराज नागेकर, अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इरफान किल्लेदार, सेवादल अध्यक्ष संजय नाईक, तेजस सावंत, पराग सबनीस व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
निर्जंतुकीकरण मोहीम राबवावी
कुडचडेत ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या दु:खदायी आहेत. जनतेला योग्य सेवा देण्यात शासन अपयशी ठरत आहे, अशी टीका शेख यांनी केली. कुडचडे हा कोरोना हॉटस्पॉट बनू नये यासाठी कुडचडेत एक दिवस स्वेच्छा लॉकडाऊन जाहीर करावा आणि परिसर निर्जंतुक करावा, अशी मागणी करणारे निवेदन 7 सप्टेंबरला नगराध्यक्षांना दिले होते. पण आज 11 दिवस उलटले, तरी कोणतेच पाऊल पालिकेने घेतलेले नाही. त्यात बाजार परिसरात कित्येक दुकानदार कोरोनाबाधित सापडले आहेत. याची दखल घेऊन तरी सदर परिसर निर्जंतुक करावा, अशी मागणी नागेकर यांनी केली.