प्रतिनिधी/ सातारा
राज्यात सर्वात जास्त बाधित आढळून येणाऱ्या जिह्यामध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे 60 टक्के लसीकरण करण्याचे आदेश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. परंतु हे उद्दीष्ठ साध्य करण्यासाठी जिह्यात लसीचा तुटवडा आहे. लस आणण्यासाठी पुण्याला सकाळी गाडी गेली असून सायंकाळीपर्यत नेमकी जिह्याला किती लस मिळाली हे समजू शकले नव्हते. आतापर्यंत जिह्यात 13 लाख 63हजार जणांनी लसीची मात्रा घेतली आहे. त्यामुळै अजून निम्याहून अधिक लोक लस घ्यायचे राहिलेले आहेत.
सातारा जिह्यात सुमारे 34 लाख लोक राहतात. या सर्वांना लस देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला तेव्हापासून जिह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद आहे. मध्यरात्रीपासूनच नागरिक लसीसाठी रांगा लागत होत्या. ऑनलाईन नोंदणी करुन लसीकरण सुरु करण्यात आले. त्यानुसार मागच्या महिन्यात एकदा 45 हजार एवढे लसीकरण करण्यात आले तर सगळय़ात जास्त लसीकरण महाबळेश्वर तालुक्यात करण्यात आले आहे. नुकताच राज्याचे आरोग्य मंत्री यांनी सातारा जिह्यात जास्तीत जास्त लसीकरण कसे होईल यासाठी प्रयत्न करा, असे आदेश दिले गेले आहेत. मात्र, त्या आदेशानुसार सातारा जिह्यात लसीकरण मोहिम राबवण्यासाठी आरोग्य विभागाकडून आराखडा तयार केलेला असला तरीही प्रत्यक्ष लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे काल खाजगी 23 केंद्रावर आणि शासकीय 63 केंद्रावर 9609 जणांना लस देण्यात आली. तसेच आतापर्यंत पहिला डोस झालेल्यांची संख्या 9 लाख 62 हजार 51 तर दुसरा डोस झालेले 4 लाख 1 हजार 526 असे 13 लाख 63 हजार 577 जणांनी लस घेतली आहे.
सातारा तालुक्यात अजब फंडा
सातारा तालुक्यामध्ये लसीकरण केंद्राबाहेर कोरोना टेस्टींगचा कॅम्प लागवण्यात आला आहे. नेमके लसीकरणाला गेलेल्यांना कोरोना टेस्टींग करण्याची सक्ती केली जात आहे त्यामुळे लसीकरण केंद्रेही आता ओस पडू लागली आहेत. लसीकरणाला जायचे पण तेथे कोरोना टेस्टींग केली जात आहेत. ही कोरोना टेस्टींगची सक्ती कशासाठी हवी अशीही अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.