वार्ताहर / सावंतवाडी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. आरोग्य यंत्रणा सक्षम नाही. जिल्हा रुग्णालयाची स्थिती अत्यंत वाईट आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, आरोग्य यंत्रणा सक्षम का केली जात नाही? जिल्हय़ात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, असे मत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती महेश सारंग यांनी स्पष्ट केले.
कोरोनामुळे आतापर्यंत तालुक्यात 19 जणांचा बळी केला आहे. तर 375 जण कोरोनाबाधित आहेत. काहीजण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्हय़ात आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. पक्षीय राजकारण अशावेळी बाजूला ठेवून लोकांचे जीव वाचविण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.
जे रुग्णालयात दाखल आहेत, त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. जिल्हय़ात डॉक्टर, नर्स, कर्मचारी चांगली सेवा देत आहेत. परंतु जिल्हा रुग्णालयात
यंत्रसामुग्री अपुरी आहे, औषध पुरवठा, स्वच्छता, जेवण, पाणी याबाबत लक्ष देणे आवश्यक आहे. आता भातकापणी सुरू होणार आहे. या काळात तापसरी डोके वर काढते. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने आतापासूनच दक्षता घ्यायला हवी, असेही सारंग म्हणाले.