विविध आरोग्य योजनांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 70 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. तसेच मिशन इंद्रधनुष योजनेचा विस्तार करण्यात येणार असून आयुष्यमान भारत योजनेत नवीन 20 हजार नवीन रुग्णालये जोडण्यात येणार आहेत.
सध्या देशात कुशल डॉक्टरांची कमतरता जाणवत असल्याने वैद्यकीय महाविद्यालये जिल्हा रुग्णालयांशी जोडण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्हय़ात स्वतंत्र मेडिकल कॉलेज उभारण्यात येणार आहे. तसेच लोकल बॉडीमध्ये काम करण्यासाठी युवा इंजिनियर्सला इंटर्नशिप सुविधा दिली जाणार आहे. डॉक्टरांसाठी एक नवी प्रणाली सुरु केली जाणार असून डॉक्टरांना प्रोफेशनल बाबींमध्येही लक्ष देता येणार आहे.
पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा विस्तार करण्यात येणार असून त्यासाठी 6 हजार 400 कोटी रुपये उपलब्ध केले जाणार आहेत. या योजनेत सध्या 20 हजार हॉस्पिटल्सचा सहभाग असून ही संख्या वाढवली जाणार आहे. ज्या जिल्हय़ांमध्ये आयुषमान भारतसाठी हॉस्पिटल्सची उपलब्धता नाही तेथे खासगी-सरकारी भागिदारीतून नव्या हॉस्पिटल उभारणीसाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय उपकरणांवरील करांमधून मिळणारे उत्पन्नातून अशी हॉस्पिटल्स उभारली जातील. स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी ‘जन औषधी केंद्र’ योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. 2024 पर्यंत देशातील सर्व जिल्हय़ांमध्ये ही केंद्रे सुरू केली जाणार आहेत. या केंद्रांमधून 2 हजार औषधे व सुमारे 3 हजार सर्जिकल उपकरणे उपलब्ध होणार
आहेत.
स्वच्छ भारतसाठी 12, 300 कोटी
त्याचबरोबर ‘फिट इंडिया’ व स्वच्छ भारत योजनाही ताकदीने राबवली जाणार आहे. स्वच्छ भारत योजनेसाठी 12 हजार 300 कोटींची तरतूद केली जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्याचबरोबर प्रत्येक घरात पाईपलाईनने पाणी पोहचवण्यासाठी ‘जल जीवन मिशन’ वर काम सुरू आहे. त्यासाठी 3.6 लाख कोटी देण्यात येणार आहेत. 10 लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात याच वर्षी ही योजना सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मिशन इंद्रधनुष योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून त्यात आता 12 आजारांचा समावेश करण्यात आला आहे. 5 नव्या लसींचीही त्यासाठी उपलब्धता करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.