प्रतिनिधी/ बेळगाव :
येळ्ळूर गावामध्ये कोरोनाग्रस्त महिला रुग्ण आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर तातडीने लॉकडाऊन करण्यात आले. याचबरोबर जिल्हाधिकाऱयांनी निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित केले. पण आरोग्य विभागाने कोरोनाग्रस्त असलेल्या व्यक्तीचे घर तसेच परिसर सॅनिटायझर केले नाही. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने आणि ग्राम पंचायतीने साफ दुर्लक्ष केले आहे. केवळ रस्ते बंद करून काहीच होणार नाही तर स्वच्छता होणे गरजेचे असल्याचे मत ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
येळ्ळूरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर भीतीचे वातावरण पसरले. येळ्ळूर पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले. मंगाईनगर परिसर बंदिस्त करण्यात आला. कोरोना रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या घराचे तसेच परिसरामध्ये सॅनिटायझर होणे गरजेचे होते, पण सॅनिटायझरच करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाने आणि ग्राम पंचायतीने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी हा रुग्ण आढळला आहे, तरीदेखील कोणत्याच प्रकारची दक्षता घेण्यात आली नाही. जीवनावश्यक वस्तू मिळेनाशा झाल्या आहेत. घरातून कोणीही बाहेर आले तर त्यांना पोलीस मारबडव करत आहेत. ही सुरक्षितता असली तरी आरोग्य विभागाने जी दक्षता घ्यायची आहे, ती घेतली गेलेली नाही. ग्राम पंचायतीच्यावतीने दोन ते तीनवेळा औषध फवारणी करण्यात आली. मात्र यावर न थांबता हा परिसर सॅनिटायझर होणे गरजेचे आहे. तेव्हा तालुका आरोग्य अधिकाऱयांनी तातडीने याची दखल घ्यावी आणि परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.
आशा कार्यकर्त्यांबरोबर अरेरावी
कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर आशा कार्यकर्त्यांना सर्व्हे करण्यास सांगण्यात आले. त्या कार्यकर्त्या परिसरात जाऊन सर्व्हे करू लागल्या आहेत. मात्र काहीजण त्यांच्याशी अरेरावी करत आहेत. योग्य माहिती देत नाहीत. त्यामुळे आशा कार्यकर्त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येळ्ळूर गावामध्ये केवळ काही मोजकीच घरे मुस्लीम बांधवांची आहेत. मात्र त्या ठिकाणी सर्व्हे करण्यास गेले असता आशा कार्यकर्त्यांशी हुजत घातली जात आहे. तेव्हा पोलिसांनी आशा कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.