प्रतिनिधी / सातारा :
कोरोनातही आशा व गटप्रवर्तक आरोग्य धोक्यात घालून काम करत आहेत. कोणत्याही सोयी-सुविधा शासनाकडून देण्यात येत नाहीत. या कामाचे मानधनही त्यांना वेळेवर मिळत नाही. यामुळे सोमवारी सर्व आशा व गटप्रवर्तकांनी एक दिवशी देशव्यापी संप पुकारला होता. एक दिवस काम बंद ठेवून हा संप यशस्वीपणे पुर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सीआयटीयु) च्या अध्यक्षा कॉ. आनंदी अवघडे यांनी दिली.
अवघडे म्हणाल्या, सोमवारी जिल्ह्यातील 85 टक्के काम आशानी बंद ठेवले होते. आपल्या कामाच्या ठिकाणी, उपकेंद्र येथे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, आशा घोषणा देत शासनाचा निषेध केला. कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालूनही कोणतीच सुरक्षा देण्यात येत नाही. आशाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मागण्यासाठी आ. शशिकांत शिंदे यांची भेट घेवून त्यांना मागण्याचे निवेदन दिले. यामध्ये आशा व सुपरवायझर यांना कोरोना सर्व्हेस ग्रामपंचायत स्तरावरून मासिक 1 हजार रूपये देण्यात यावे अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत आ. शशिकांत शिंदे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना फोन करून ही मागणी तात्काळ पूर्ण करण्यास सांगितले. यावेळी वैशाली भोसले, सुषमा चव्हाण, सुजाता जाधव व इतर आशा व गटप्रवर्तक उपस्थित होते.