ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, मनुष्यबळ विकास व दळणवळण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निर्देशानुसार भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाची आरोग्य सेतू अॅप टीम आणि महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि एनआयसीचे डीआयओ यांच्या दरम्यान चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, आरोग्य सेतू व्यासपिठाद्वारे उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण राज्यातील रोगाच्या संक्रमणाच्या गतिशीलतेबद्दल सूक्ष्म आणि अति-सूक्ष्म दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. या आकडेवारीचा प्रभावी आणि वेळेवर उपयोग केल्यास हॉटस्पॉट विकसित होण्याआधीच त्यांच्यावर आळा घालण्यामध्ये आणि नियोजित व लक्ष्यित पद्धतीने आरोग्य पायाभूत सुविधांचे वाटप आणि वेळेवर त्यात वृद्धी करण्यासाठी ही आकडेवारी महत्वपूर्ण ठरू शकते.
क्षेत्रस्तरीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना धोत्रे म्हणाले की, कोविड-19 च्या विरोधात लढाईसाठी आरोग्य सेतु अॅपचा व्यापक वापर आवश्यक आहे. कोविड-19 चे संभाव्य धोके ओळखण्यासाठी आणि पुढील संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे त्याच्या आकडेवारीचा पूर्णपणे वापर केला जाऊ शकतो.
महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोविड-19 विरुद्धच्या लढाईतील तंत्रज्ञानाचे महत्व सांगितले. धोत्रे याच्या आदेशानुसार क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत तांत्रिक टीमचा संवाद साधण्यासाठी आयोजित केलेल्या या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली. महाराष्ट्र सरकारचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री सतेज पाटील यांनी आरोग्य सेतु अॅपच्या वापरावर भर दिला आणि जिल्हाधिकाऱ्यांना व्यापक प्रशिक्षण देऊन त्याचा उपयोग आणखी वृद्धिंगत होईल अशी सूचना त्यांनी यावेळी केली.