जिह्यातील कोविड मृत्यूला पालकमंत्री जबाबदार – परशुराम उपरकर यांचा गंभीर आरोप
प्रतिनिधी / कणकवली:
कोरोनाने सिंधुदुर्ग जिल्हय़ातील 600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेत. त्याला पालकमंत्री, लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. ज्या जनतेने या मंडळींना निवडून दिले त्यांचा जीव घेण्याचे काम हे करीत आहेत. दररोज हॉस्पिटलला जाणाऱयांना रुग्णालयाच्या समस्या, नर्सेसचे प्रश्न समजत नाहीत, हे दुर्दैव आहे. लोकांचे जीव वाचवायचे असतील तर फोटोसेशन कमी करून सेवा द्या. मात्र, यांचा सेवेकडे लक्ष नसून खरेदीवर लक्ष असल्याने सत्ताधाऱयांना आरोग्यसेवेबाबत गांभीर्यच नसल्याचा आरोप मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.
ऑनलाईन पत्रकार परिषदेत उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा आता रेडझोनमध्ये आला आहे. प्रशासन आपल्यापरिने काम करत असले तरिही जिल्हय़ाला सक्षम शल्य चिकित्सक देण्यास पालकमंत्री, लोकप्रतिनिधी अपयशी ठरलेत. जिल्हा रुग्णालयाचा डोलारा डॉक्टरांपेक्षा नर्सेसच सांभाळत आहेत. अशा स्थितीत शल्य चिकित्सकांनी मुख्यालयी थांबण्याची गरज आहे. पण, ते थांबत नाहीत. पीएम फंडामधील व्हेंटिलेटर चालत नाहीत. काही ठराविकच व्हेंटिलेटर चालतात. पालकमंत्र्यांनी व्हेंटिलेटर, शववाहिनीची घोषणा केली, पण अजूनही पूर्तता झालेली नाही. 12 पैकी 6 रुग्णवाहिकाच आल्या. त्यावर चालक नाहीत, अशी स्थिती आहे.
जिल्हा आज रेडझोनमध्ये आहे. जिल्हय़ातील डॉक्टर्सनी सेवा देत सहकार्य करण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी सांगतात, जादा मानधन देऊनही डॉक्टर्स मिळत नाहीत. अशावेळी खासगी डॉक्टर्सनीही पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. तसे होत नसेल तर प्रशासनाने कायद्याचा वापर करून हॉस्पिटल ताब्यात घ्यायला हवीत व लोकांना सुविधा द्यायला हव्यात. पालकमंत्री, आमदार केवळ घोषणा करतात, पण लोकांचे जीव जात आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, जि. प. सदस्य गेले. या साऱयाला ढीसाळ कारभार जबाबदार आहे. रुग्णालयात रुग्णांचे नातेवाईक राबतात, त्यामुळे प्रसारही वाढत आहे, असे उपरकर म्हणाले.
डॉ. नागेश पवारसारख्या पहिल्या लाटेत काम केलेल्या डॉक्टरांची बाहेर बदली करण्यात आली. त्यांना बदलीच्या ठिकाणी जायचे नाही. पण, त्यांना येथे बदलून देत नाहीत. ते खासगी कोविड सेंटरमध्ये काम करतात. ही बदली रद्द करणेही यांच्याकडून होत नाही. याचा लक्ष केवळ खरेदीवर आहे. ज्या डॉक्टरांबद्दल नर्सेसची तक्रार होती ते डॉक्टर्स पालकमंत्र्यांनी बोलावूनही आले नाहीत. पालकमंत्र्यांना कुणीही जुमानत नाहीत. शल्य चिकित्सकांना शिव्या घालून उपयोग काय? डॉक्टर्स, स्टाफ, साहित्य द्या, लोकांचे जीव वाचवा अशी मनसेची विनंती असल्याचेही उपरकर म्हणाले. teDuration