प्रतिनिधी/ मडगाव
आरोशी ते केळशीपर्यंतचा किनारी पट्टा सीआरझेडमध्ये वाळूच्या टेकडय़ा म्हणून दाखविण्यात आला असून अशाने या किनारी भागात पारंपरिक मासेमारी तसेच शॅक्स व पर्यटनाशी संबधित अन्य व्यवसाय करणे शक्मय होणार नाही. त्यामुळे सदर आरखडय़ातील या वाळूच्या टेकडय़ांच्या नोंदी हटवून तो रद्द करावा, अशी मागणी बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी सरकारला केली असून यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना त्यांनी पत्र लिहिले आहे.
वार्का येथील आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वरील मागणी उचलून धरली. गोव्याचा गंध नसलेल्या अधिकाऱयांनी गुगल मॅप पाहून वरील भागात वाळूच्या टेकडय़ा असल्याचा आराखडा तयार केला आहे. त्यांना सामाजिक कार्यकर्ते खतपाणी घालत आहेत, अशी टीका आलेमाव यांनी केली. यावेळी क्लाऊड आल्वारीस यांचे नाव घेताना या मेंगळुरी माणसाला गोव्याचे काय पडून गेले आहे, असा सवाल त्यांनी केला. आधी खनिज व्यवसाय बंद पाडल्यानंतर आता पर्यटन व्यवसाय संपविण्याचा प्रयत्न या अधिकारी व तथाकथित सामाजिक कार्यकर्त्यांनी चालविला आहे, असा आरोप त्यांनी केला. असे घडले, तर गोव्याचा आर्थिक कणा मोडला जाईल. हेच या बिगरगोमंतकीय अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांना हवे आहे. यामागे त्यांचे षड्यंत्रही असू शकते. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी यात लक्ष घालून आराखडा रद्द करावा, अशी मागणी आलेमाव यांनी केली.
समुद्र व नदीचा संगम होत असलेल्या कुटबण येथील ठिकाणी ट्रॉलर बाहेर नेणे व आंत आणणे शक्मय होत नाही. या ठिकाणी तळपे असल्याने ट्रॉलर व जहाजे या दगडांना आदळून फुटण्याचे प्रकार आधी घडले आहेत. या जागी काँक्रिटची बांधणी करून घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली होती. केंद्राकडून निधी उपलब्ध झालेला आहे. पण या कामालाही एका सामाजिक कार्यकर्त्याने आक्षेप घेतला व राष्ट्रीय हरित लवादकडे खटला गुदरविला. त्यामुळे या समुद्र व नदीच्या मुखाजवळ रेतीचे पट्टे तयार झाले आहेत. त्यातून अन्य ठिकाणी रेती गोळा होऊ लागली आहे. त्यास काही जण वाळूच्या टेकडय़ा म्हणत आहेत, असा दावाही आलेमाव यांनी केला. सदर खटला हरित लवादाने फेटाळून लावलेला असून सरकारने त्वरित काँक्रिटची बांधणी करण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
सुरावली ते पुढील अडीच किलोमीटरच्या बगलरस्त्यावर लोखंडी पूल उभारणे शक्मय असल्याची माहिती आपणास तज्ञांकडून मिळाली आहे. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून लोखंडी पूल उभारावा व सखल भाग पाण्याखाली जाणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे, असे आलेमाव यांनी नजरेस आणून दिले.