जागतिक तापमानवाढीमुळे उत्तर ध्रुव प्रदेशातील हिम (बर्फ) झपाटय़ाने वितळत आहे. या वितलनाचा वेग येत्या काही वर्षांत मंदावला नाही तर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून मुंबईसह जगातील अनेक शहरांचा कमी अधिक भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तापमान वाढीस कारणीभूत ठरणाऱया वायूंचे प्रमाणे कमी करून तापमानवाढ रोखणे हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हान आहे.
तथापि तापमानवाढ रोखण्याचा उपाय हा दीर्घकालीन आहे. आजपासून प्रारंभ केल्यास त्याचा परिणाम दिसून येण्यास किमान 25 वर्षांचा कालावधी लागू शकतो. तोपर्यंत काही तात्कालिक उपाय करणे आवश्यक आहेत. उत्तर ध्रुवरील बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बारकाईने दृष्टी ठेवणे हा एक उपाय त्याचे परिणाम समजून घेण्यासाठी केला जात आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने निर्माण करण्यात आलेली आईसनेट ही यंत्रणा हिम वितलनावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष ठेवत आहे. या यंत्रणेच्या साहाय्याने बर्फ वितळण्याचे अचूक पूर्वानुमान काढता येते. व त्यानुसार उपाययोजना करता येते. उन्हाळय़ाच्या दिवसात उत्तर ध्रुवावरील साधारणतः 50टक्के बर्फ वितळते तर हिवाळय़ाच्या दिवसात -50 डिग्री तापमानामुळे पुन्हा हिमनिर्मिती होते. हे चक्र अव्याहतपणे कोटय़वधी वर्षे सुरू आहे. यामध्ये सुक्ष्म प्रमाणात झालेला बदलही टिपण्याची आईसनेटची क्षमता आहे. आईसनेटकडून मिळणारी माहिती उत्तर ध्रुवावरील हिमनाशाचे प्रमाण आणि वेग दर्शविते. त्यामुळे या माहितीच्या आधारे काही उपाययोजना वेळीच करणे शक्य होते. अमेरिकेसह अनेक प्रगत देशांच्या प्रयोग शाळांनी एकत्रितरित्या या यंत्रणेची निर्मिती केली आहे.