एखाद्या सिनेमामध्ये एखाद्या पात्राचं नाव लोकप्रिय झाले की त्याच नावाने त्या कलाकाराची ओळख बनून जाते. त्यामुळे त्याच्या खऱया नावाऐवजी त्याच्या भूमिकेतील नावच त्याची ओळख ठरते. ‘आर्ची’ हे असेच एक नाव म्हटले पाहिजे. खरे नाव रिंकू राजगुरू असूनही ‘सैराट’च्या यशानंतर अद्याप ती ‘आर्ची’ याच नावाने ओळखली जाते. आर्चीच्या नव्या चित्रपटाचे आगमन शुक्रवारी झाल.
आर्ची नव्याने आपल्या ‘मेकअप’ या चित्रपटाद्वारे पडद्यावर आली आहे. अर्थातच आर्चीच्या चाहत्यांसाठी ही एक उत्तम पर्वणी आहे. मराठी चित्रपटसृष्टी आज नव्या विषयांची हाताळणी करण्यासाठी अग्रेसर आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटातदेखील अशीच उत्तम विषयाची बांधणी आहे. प्रेक्षकांच्या अभिरूचीनुसार बदलत्या प्रवाहांचा प्रभाव या चित्रपटावर आहे. त्यामधून हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकून घेईल, असे मानण्यास हरकत नाही.
ग्लोब चित्रपटगृहात ‘मेकअप’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आर्ची म्हणजेच रिंकूसाठी हा तिसरा चित्रपट आहे. ‘सैराट’पाठोपाठ ‘कागर’ आणि आता ‘मेकअप’ चित्रपटाद्वारे आर्ची चित्रपटसृष्टीत स्थिरावणार आहे. येणाऱया काळात तिचे आणखी काही चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीला येतील, असा विश्वास प्रेक्षकांमध्ये आहे. चित्रपटाचे व्यावसायिक यश हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. मात्र ‘आर्ची’ प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे. त्यामुळे युवा प्रेक्षक वर्ग तिचे स्वागत नक्की करेल, असे मानण्यास हरकत नाही.
या नव्या चित्रपटात आर्चीचा सोबती म्हणून चिन्मय उद्गीरकर हा कलाकार चमकला आहे. यापूर्वी अनेक चॅनल्सवरून दिसणाऱया मालिकांमधून हा कलाकार लोकप्रिय ठरला आहेच. या कलाकाराच्या बरोबरीने अनेक दिग्गजांची मांदियाळी झळकते आहे. त्यामुळे हा चित्रपट यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त करण्यास जागा आहे.