प्रतिनिधी/बेळगाव :
कोरोनाच्या संकटाने केवळ भारतीय अर्थव्यवस्थेवर नव्हे तर जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. प्रगतिपथावर असलेला आपला देश पुन्हा 10 ते 15 वर्षे मागे गेला आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ आपल्या सगळय़ांना एकत्रित काम करावे लागणार आहे, असे विचार राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी व्यक्त केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठ व संगोळ्ळी रायण्णा पदवीपूर्व महाविद्यालय यांच्यावतीने गुरुवारी एक दिवसाचे ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कोविड-19चा भारतीय अर्थव्यवस्था आणि उद्योगावर परिणाम हा चर्चासत्राचा विषय होता. या चर्चासत्राचे उद्घाटन केल्यानंतर रामचंद्रगौडा बोलत होते. संगोळ्ळी रायण्णा महाविद्यालयाचे प्राचार्य व चर्चासत्राचे संयोजक एम. जयप्पा यांच्या पुढाकाराने हे चर्चासत्र होत असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
ते म्हणाले, कोविडमुळे सरकारी नोकर, खासगी नोकर, सर्व घटकांतील उद्योजक, शेअर मार्केट अशा एकूण एक क्षेत्रावर परिणाम झाला आहे. उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासारखी परिस्थिती नाही. हॉटेल, सिनेमा मॉल, शॉपिंग मॉल, कृषी ही क्षेत्रेसुद्धा सध्या अडचणीत सापडली आहेत. मात्र, आपण सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे. कर्नाटक सरकारने 1461 कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे. पण सरकारबरोबर संपूर्ण समाजाला एकत्रित काम करून अर्थव्यवस्था बळकट करावयाची आहे. यावेळी 1200 हून अधिक जणांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला.