प्रतिनिधी / कोल्हापूर
गुंतवणूकीच्या दुप्पट परतावा देण्याचा अमिषाने महिलांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या तिघांना विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी सात वर्ष कारावास व प्रत्येकी 1 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आनंद शिवराम तांबे (वय 49 रा. कल्याण जि. ठाणे), भुपसिंग सुरग्यानसिंग (वय 40 रा. नवी दिल्ली), मोहन अर्जुन केसवाणी (वय 59 रा. जयपूर) अशी तिघांची नावे आहेत. 23 सप्टेंबर 2009 ते 12 डिसेंबर 2012 दरम्यान ही घटना घडली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, शाईन मल्टी ट्रेड इंडीया प्रायव्हेट लिमीटेड जयपूर या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर भुपसिंग, शिवराम तांबे व सुनिल घाडगे यांनी कोल्हापूरातील सुमारे 125 हून अधिक महिलांकडून गुंतवणूकीच्या दुप्पट परतावा देण्याच्या अमिषाने 23 सप्टेंबर 2009 ते 12 डिसेंबर 2012 या कालावधीमध्ये 125 महिलांकडून सुमारे 7 लाख 9 हजार रुपये गोळा केले. सदरची रक्कम कोल्हापूरातील आयसीआयसीआय व सारस्वत बँकेत कंपनीच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले होते. प्रत्येक महिलेने 9 हजार 999 रुपये कंपनीमध्ये गुंतवणे तसेच आणखी दोन मेंबर केल्यानंतर गुंतवणूकीच्या दुप्पट रक्कम प्रत्येक महिन्याला देण्याचे अमिष दाखवण्यात आले होते. 12 महिने परताव्याची रक्कम संबंधीत महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार होती. मात्र पहिले दोन तीन महिने परतावा दिल्यानंतर महिलांच्या खात्यावर रक्कम जमा करणे बंद करण्यात आले होते. यामुळे हवालदिल झालेल्या संगीता लोखंडे, लता शिंदे, सुवर्णा क्षीरसागर या महिलांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबतची फिर्याद दिली होती.
हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषणकडे वर्ग करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक ए. ए. बोडके यांनी घटनेचा तपास करुन आनंद तांबे, भुपसिंग सुरग्यानसिंग, मोहन केसवाणी यांच्याविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले हेते. विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्यासमोर तीन वर्षे या खटल्याची सुनावणी झाली. या खटल्यामध्ये सरकारी वकील ऍड. समीलउल्ला पाटील यांच्याकडून 14 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी संगीता लोखंडे, लता शिंदे, सुवर्णा क्षीरसागर कंपनीकरीता वेबसाईट डिझाईन केलेल्या अमित लथुरा यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सरकारी वकील ऍड समीलउल्ला पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य मानून विशेष न्यायालयाने आनंद तांबे, भुपसिंग सुरग्यानसिंग, मोहन केसवाणी यांना भादविस कलम 420 व 120 ब प्रमाणे सात वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 5 हजार दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने कारावास तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम 1999 मधील कलम 3 खाली सहा वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी 1 लाख रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावास आणि प्राईज चिट्स अॅड मनी सर्क्युलेशन स्कीम्स बॅनिंग ऍक्ट 1978 मधील कलम 4, 5,6 खाली दोन वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी 3 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या कामी ऍड. सनी शिर्के, ऍड. सुमित प्रभावळे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल साताप्पा कळंत्रे व सहाय्यक फौजदार एम. एम. नाईक यांचे सहकार्य लाभले.
पहिलीच शिक्षा
महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 आणि प्राईज चिट्स अँड मनी सर्क्युलेशन स्कीम्स बॅनिंग ऍक्ट मधील कलमाखाली गुणदोषावर खटला चालवून शिक्षा होण्याची पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.