आपच्या राष्ट्रीय नेत्या आतिशी यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी /पणजी
आर्थिक सुबत्ता असणे हेच महिलांचे खरे सशक्तीकरण आहे, आणि आम आदमी पक्षाची सत्ता येताच खऱया अर्थाने गोव्यातीह महिला आर्थिकदृष्टय़ा सशक्त बनतील, असा दावा आपच्या राष्ट्रीय नेत्या तथा दिल्लीच्या आमदार आतिशी मार्लेना यांनी केला.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यावेळी वाल्मिकी नाईक आणि सिसिल रॉड्रिग्स यांची उपस्थिती होती. गोव्यातील 50 टक्के महिला स्वतंत्र नाही. त्यासाठी आप सत्तेवर येणे काळाची गरज आहे. सत्ता मिळाल्यास आम्ही गृह आधारची रक्कम सध्याच्या 1500 वरून 2500 रुपये करणार आहोत. तसेच ही रक्कम न चूकता दर महिन्याच्या 1 तारखेला वितरित करण्यात येईल, असे आश्वासन आतिशी यांनी दिले.
त्याशिवाय 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक महिलेला गृह आधारच्याच धर्तीवर प्रत्येकी 1000 रुपये दरमहा देण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक महिला सक्षम बनेल, असे त्या म्हणाल्या.
त्यावेळी एका पत्रकाराने ’एवढे पैसे कुठून आणणार?, असे विचारले असता, स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त सरकारच्या माध्यमातून ते सहज शक्य आहे, असे त्या म्हणाल्या. राज्याचा अर्थसंकल्प 22 हजार कोटींचा आहे. परंतु त्यातील 20 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ही मंत्री, आमदार व सरकारी अधिकारी यांच्या खिशात जाते. त्यामुळे जनतेसाठी काहीच उरत नाही. भ्रष्टाचार कमी झाल्यास राज्याचे बजेट आपसूकच वाढेल व जनतेवर खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल, असे त्या म्हणाल्या.
मुख्यमंत्री कॉपीमास्टर : वाल्मिकी
भाजप सरकार कॉपीमास्टर असून आमच्या अभिनव योजनांची चोरी व कॉपी करत असल्याचा आरोप आप नेते वाल्मिकी नाईक यांनी केला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या गोवा दौऱयात प्रत्येकवेळी नवनव्या हमी दिल्या. योजना जाहीर केल्या. परंतु नंतर लगेच भाजप सरकार आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या योजना स्वतःच्या नावावर खपविण्याचे प्रयत्न केले.
आम्ही मोफत वीज योजना जाहीर केली, मुख्यमंत्र्यांनी मोफत पाणी देण्याची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांनी पाणी बिलात दुप्पट वाढ केली व लोकांच्या ’डोळ्यांना पाणी लावले’. आम्ही घरटी एक नोकरी देण्याचे वचन दिले, लगेच मुख्यमंत्र्यांनी 10 हजार नोकऱया देण्याची घोषणा केली. परंतु आजपर्यंत एकलासुद्धा कायम स्वरुपी नोकरी दिल्याची माहिती मिळालेली नाही. यावरून नोकऱयांची ही घोषणा म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जुमला होता हेच स्पष्ट झाले, असे वाल्मिकी म्हणाले. केजरीवाल यांनी तीर्थयात्रा योजना जाहीर केली, तर प्रमोद सावंत यांनी तिचीही कॉपी करण्याचा प्रयत्न केला. कहर म्हणजे ’ही योजना केजरीवाल यांच्याही आधी आपण सुरू केली होती’, असा दावाही त्यांनी केला व स्वतःचा खोटारडेपणा सिद्ध केला, असे वाल्मिकी म्हणाले. सिसिल रॉड्रिग्स यांनी प्रारंभी महिला सशक्तीकरणासंबंधी पक्षाच्या धोरणाबद्दल माहिती दिली. महिलांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहनाची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या हाती पैसा खेळला पाहिजे. हीच बाब लक्षात घेऊन आम आदमी पक्षाने महिला सशक्तीकरणास प्राधान्य देण्याचे ठरविले आहे, असे त्या म्हणाल्या.