होळीचागाव येथे फळबाग लागवडसह खते बियाणे वाटप
औंध/प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी शेती करताना पिकाबरोबरच फळबाग लागवड करणे गरजेचे आहे. कारण आर्थिकस्थिती सुधारण्यासाठी फळबाग लागवड आवश्यक आहे. शासन यासाठी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करील अशी ग्वाही सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत होळीचागाव ता. खटाव येथील शेतात आंबा फळबाग लागवडीचा शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
जिल्हा कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, महेश झेंडे, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसीलदार डॉ.अर्चना पाटील, सभापती रेखा घार्गे, तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव, माजी सभापती संदीप मांडवे, शिवाजीराव सर्वगोड, भाऊसाहेब लादे, दिलीप दाभाडे, हिंदकेसरी संतोषआबा वेताळ, सरपंच अविनाश शिंदे, संजय शिंदे, एस. एस. माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले की यापूर्वी शेतात देशी आंब्याची झाडे अपवादाने आढळत होती. त्यामुळे हापूस आंबा कोकणातून मागवावा लागत होता मात्र कृषी विभागाने केलेल्या प्रयोगाअंती आपल्या कडे हापूस आंबा पिक येते हे सिध्द झाले आहे. शेतकऱ्यांनी देखील विविध प्रकारच्या फळबागांची लागवड करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नरेगा अंतर्गत गांडूळ खत युनिट या कामाचा शुभारंभ करण्यात आला. बांधावर राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य योजनेतून व आत्मा योजनेमधून प्रात्यक्षिकासाठी निवड केलेल्या लाभार्थ्यांना बांधावरच बियाणे वाटप करणेत आले .
मंडलकृषी अधिकारी दिलीप दाभाडे यांनी प्रास्ताविक केले भाऊसाहेब लादे यांनी आभार मानले. यावेळी ग्रामसेवक, कृषीसहाय्यक तलाठी व शेतकरी बांधव उपस्थित होते.