शहरासह उपनगरे-ग्रामीण भागात पाऊस : पिकांना दमदार पावसाची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
मान्सूनचे आगमन जोरदार झाले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. दमदार पावसामुळे पूर आला होता. मात्र, त्यानंतर पावसाने गेल्या 10 ते 12 दिवसांपासून दडी मारली होती. ऊनही पडत होते. त्यामुळे हवेमध्ये उष्मा जाणवत होता. मंगळवारी दुपारी अचानकपणे ढगांचा गडगडाट होत पावसाचे आगमन झाले आणि दमदार सरी कोसळल्या.
शहरातील मध्यवर्ती भागामध्ये दुपारच्या वेळी पाऊस झाला. शहराच्या काही उपनगरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सायंकाळच्या वेळी पाऊस झाला. मान्सूनच्या वेळीच अशाप्रकारे ढगांचा गडगडाट करत पावसाचे आगमन झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. मान्सूनच्या काळात ढगांचा गडगडाट किंवा विजांचा कडकडाट होत नाही. पण भर मान्सूनच्या वेळेतच अशाप्रकारे पाऊस झाल्याने पुन्हा पाऊस लांबणार का? अशी भीती व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळपासूनच उष्मा जाणवत होता. त्यानंतर दुपारच्या वेळी अचानकपणे ढग जमू लागले आणि गडगडाट करतच पाऊस आला. पाऊस पडल्यानंतर काही वेळेत पुन्हा ऊन आले. यामुळे काही जणांनी श्रावणमासाचा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पाऊस झाल्यानंतरही पुन्हा उष्म्यामध्ये वाढ झाली होती. एकूणच एक वेगळा अनुभव या पावसाने दिला आहे. शहरासह ग्रामीण भागातही काही ठिकाणी पाऊस झाला. सध्या भात पिकाला तसेच इतर पिकांना पावसाची नितांत गरज आहे. दमदार पाऊस पडेल, अशी साऱयांनाच अपेक्षा होती पण तसा मोठा पाऊस झाला नाही. काही भागांमध्ये पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे वळिवासारखाच पाऊस पडला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत होत्या.
कडोली भागात पावसाच्या दमदार सरी
कडोलीसह परिसरात मंगळवारी दुपारी पावसाच्या दमदार सरी कोसळल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भात, बटाटा, मका, भुईमूग ही पिके धोक्यात आली आहेत. शेतकरी चिंताग्रस्त होते. ऐन पावसाळय़ातच उन्हाचे चटके बसत होते. त्यानंतर मंगळवारी दुपारी ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, अजूनही मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत.
येळ्ळूर परिसरातही पावसाचा शिडकावा
शहरामध्ये पावसाचे दुपारी आगमन झाले. मात्र, येळ्ळूर परिसरात सायंकाळच्या वेळी पावसाचे आगमन झाले. त्यामुळे भात पिकाला काहीसे जीवदान मिळाले आहे. मान्सून पाऊस हा गावच्या पश्चिमेकडून येतो. मात्र, मंगळवारी झालेला हा पाऊस पूर्वेकडून आल्याने तसेच ढगांचा गडगडाट करत पाऊस पडल्यामुळे हा वळिवाचाच पाऊस झाल्याचे परिसरातील शेतकऱयांनी सांगितले.