ऑनलाईन टीम / येरेआन :
रशियाच्या मध्यस्थीनंतर दोनच दिवसांपूर्वी आर्मेनिया-अझरबैजान या दोन्ही देशांनी आपापसातील युद्धाला पूर्णविराम दिला होता. मात्र, रविवारी मध्यरात्री आर्मेनियाने अझरबैझानमधील दोन शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा आरोप अझरबैझानने केला आहे.
अझरबैझानमधील गाजा आणि मिंगाशेविर या दोन शहरांवर आर्मेनियाच्या सुरक्षा यंत्रणांनी क्षेपणास्त्र हल्ला केला. यात 9 लोकांचा मृत्यू झाला असून, 30 हून अधिक जण जखमी झाले आहेत. तसेच अझरबैझानच्या सैन्यानेही स्टेपनाकर्ट आणि अन्य भागात आर्मेनियाने गोळीबार केल्याचा आरोप केला आहे. आर्मेनियाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आर्मेनिया-अझरबैजान या दोन्ही देशात नागोर्नो-काराबाख या विभाजनवादी भूभागावरून मागील दोन आठवड्यापासून युद्ध सुरू होते. या युद्धात दोन्ही देशातील 3 हजारहून अधिक जण मारले गेले आहेत. हे युद्ध थांबवण्यासाठी रशियाने मध्यस्थी केली होती. चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली. युद्धबंदीच्या घोषणेनंतर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्वतंत्र निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये त्यांनी कैद्यांच्या आदानप्रदानीबरोबरच मृत जवानांच्या शोधासाठी परस्परांना सहकार्य करण्याची तयारी दर्शविली होती.